Rajendra Nimbhorkar On Majha Katta : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी (Pahalgam Terrorist Attack) हे पाकिस्तानला गेले नाहीत, ते काश्मीरातच आहेत. योग्य वेळ येताच त्यांना शोधून काढून भारतीय लष्कर त्यांना ठार करेल असा विश्वास निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केला. आज जर आपली लढाई झाली तर ती शेवटपर्यंत लढण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. युद्धाय कृतनिश्चय, म्हणत आज भारताचं लष्कर युद्धसज्ज आहे. अब जंग जरुरी है असं म्हणत सर्वसामान्य लोकही युद्धासाठी मानसिक तयारी दर्शवत आहेत. पण मैदानावर युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असतं ते अचूक मार्गदर्शन, अतुल्य साहस, योग्य व्यूहरचना, शत्रूची खडान् खडा माहिती, दुर्दम्य आत्मविश्वास आणि समयसूचकता. याच जोरावर अनेक लष्करी मोहिमा यशस्वी करणारे निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (Lieutenant General Rajendra Nimbhorkar) यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधला.
Uri Surgical Strike Real Hero : उरी सर्जिकल स्ट्राईकचे हिरो
भारत आणि पाकिस्तानच्या सीमाभागातली ही तणावाची परिस्थिती राजेंद्र निंभोरकरांनी जवळून अनुभवली आहे. पाकिस्तानच्या कुरापतींना भारत तोडीस तोड उत्तर देऊ शकतो, हे अधोरेखित करणारा उरीचा सर्जिकल स्ट्राईक लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकरांच्या नेतृत्वात झाला. लेह, कारगिल, काश्मिर, पूंछ, राजौरी, राजस्थान आणि इशान्य भारतासह अनेक ऑपरेशन्समध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे. बारामुल्लात त्यांनी 22 दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीसाठी परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
सीमाभागातली सद्यस्थिती, भारत सर्जिकल स्ट्राईक करणार की आता युद्ध हा एकमेव पर्याय आहे. जर युद्ध झालं तर त्याचे दोन्ही देशांवर काय परिणाम होतील, हा हल्ला करण्यामागे पाकिस्तानचा नेमका हेतू काय, लष्कराला फ्री हँड देण्याने काय साध्य होईल यासह सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांनी एबीपी माझाच्या दर्शकांसोबत संवाद साधला.
Indus Water Treaty : सिंधू नदीचे पाणी अडवलं हे मोठं पाऊल
भारताने सिंधू पाणी वाटप करार रद्द करुन मोठं पाऊल उचललं असल्याचं मत राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, ज्यावेळी आपण हा करार केला होता त्यावेळी आपल्याला तशी काय गरज नव्हती. ज्या रावी, बियास आणि सतलज या तीन नद्यांचे आपल्याकडे पाणी होतं त्याचाही आपण वापर करु शकत नव्हतो. त्यामुळे त्यावेळी आपण तो निर्णय घेतला. आता परिस्थिती बदलली आहे. सिंधू, चिनाब आणि झेलममधील पाणी अर्धेजरी अडवले तरी आपल्याला मोठा फायदा होईल. या नद्यांचे पाणी अडवून हे इतर नद्यांमध्ये सोडू शकतो.
Shimla Agreement : शिमला करार रद्दचा भारताला फायदाच
राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, "भारताच्या भूमिकेनंतर शिमला करार रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पण त्यामध्ये भारताला नुकसान होईल असे मोठे काहीच मोठे कलम नाही. या कराराचे पालन फक्त भारतच करत होता, पाकिस्तान त्याचं उल्लंघन करत होताच. 1999 साली वाजपेयींनी सीमा पार न करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी जर आपण कारवाई केली असती तर पाकव्याप्त काश्मीरचा मोठा भाग आज भारताकडे असता."
Pahalgam Terrorist Attack : गुप्तचर यंत्रणांचे अपयश
पहलगाम दहशतवादी हल्ला हा गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे का असा प्रश्न विचारल्यानंतर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, "प्रत्येक देशामध्ये या गोष्टी घडत असतात. इस्त्रायलमध्येही गुप्तचर यंत्रणांना अनेकवेळा अपयश आलं आहे. 2010 पासून आतापर्यंत खूप कमी दहशतवादी कारवाया झाल्या. एखाद्या वेळी अशी घटना घडू शकते."
तीनही सैन्याने मिळून काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. पंतप्रधानांनी तीनही सेनांना अधिकार दिले आहेत ही गोष्टही मोठी आहे. त्याचा सकारात्मक परिणाम सेनेवर होऊ शकतो. सैन्यदल अधिक कार्यक्षमतेने काम करु शकतात असं मत राजेंद्र निंभोरकर यांनी व्यक्त केलं.
Uri Surgical Strike : उरीच्या वेळी काय झालं?
राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, "उरीवर दहशतवादी हल्ला त्यावेळी मी जम्मूमध्ये कार्यरत होतो. त्यावेळी मी सहा प्लॅन दिले होते. इतर अनेकांनीही अनेक प्लॅन दिले होते. त्यावेळी ही संधी मला मिळाली. यासाठी जे कमांडो निवडले होते त्यांना क्वारंटाईन केलं, त्यांचे मोबाईल काढून घेतलं. त्यांना काय कारवाई करायची याची माहितीही नव्हती. पुढच्या आठ दिवसात उरी हल्ल्याचा बदला घेतला. संध्याकाळी साडेसात वाजेपासून ही कारवाई सुरू केली आणि ती पहाटे पाच वाजेपर्यंत ती चालली. "
उरी हल्ल्याच्या माध्यमातून आपण करिअरमधील खूप मोठं यश मिळवलं असल्याचं राजेंद्र निंभोरकरांनी अभिमानाने सांगितलं. उरी सर्जिकल स्ट्राईकवर काही राजकारण्यांनी टीका केली होती. त्यावरही राजेंद्र निंभोरकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असा प्रकार व्हायला नको, कारण सैन्य हे काही कोणत्या पक्षाचे नसतात. ते भारताचे असतात असं ते म्हणाले.
Pahalgam Terrorist Names : पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी पळून गेले का?
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानमध्ये पळून गेले नसून ते काश्मीरमध्येच असल्याचं मत राजेंद्र निंभोरकरांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, "बैसरन घाटीच्या पायथ्याशी एक गाव आहे. त्या गावातील प्रत्येक घरामध्ये एक दहशतवादी आहे. त्या ठिकाणी हे दहशतवादी असण्याची शक्यता आहे. हा पूर्ण प्रदेश हा गर्द झाडीचा आहे. त्यामुळे ठाम माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कारवाई करू शकतो. हे एक ना एक दिवस होईल नक्की."
मदरशांमधील मौलवी बदलले पाहिजेत
जम्मू काश्मीरमधील परिस्थिती बदलायची असेल तर त्या ठिकाणी कट्टरतावादी शिक्षण देणारे मौलवी बदलले पाहिजेत असं मत राजेंद्र निंभोरकरांनी व्यक्त केलं. ते म्हणाले की, "त्या प्रदेशात असलेल्या तरुण-तरुणींसाठी दहशतवादी हे आदर्श आहेत. त्या ठिकाणी असलेल्या शाळेत धार्मिक तिरस्कारयुक्त शिक्षण शिकवलं जातं. मदरशामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जातं. त्या ठिकाणचे 90 टक्के मौलवी हे काश्मीरमधील नसून यूपी आणि बिहार, केरळमधील आहेत. ते खूप कट्टर आहेत. या मौलवींना आपण पगार देतो. त्या ठिकाणी आपण अत्याधुनिक विचारांचे मौलवी नेमायला हवेत असं मत राजेंद्र निंभोरकरांनी व्यक्त केलं."
Pakistan Asim Munir : पाकिस्तानच्या लष्करप्रमुखामध्ये धमक नाही
भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावानंतर पाकिस्तानचे लष्कर भारताला प्रत्युत्तर देईल का या प्रश्नावर बोलताना राजेंद्र निंभोरकर म्हणाले की, "या आधीचा लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हा मॅड टाईप व्यक्ती होता. त्याच्या मनात जे काही असेल ते तो करणारच. त्याची रिक्स टेकिंग कपॅसिटी 80 टक्के होती. फक्त 20 टक्के विजयाची क्षमता असली तरी तो पुढे जायचा. परवेझ मुशर्रफ हा एक सैनिक होता. पण सध्याचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हा सैनिक नाही तर तो धार्मिक कट्टरवादी आहे. त्याची रिस्क टेकिंग कपॅसिटी ही खूप कमी आहे. त्यामुळे तो भारताला उत्तर देईल याची शक्यता नाही."