Pravin Darekar on Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कुंभमेळ्यातील (Kumbh Mela 2025) पवित्र स्नानाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. नुकतीच कोरोना महामारी होऊन गेली आहे. दोन वर्ष तोंडाला कापड लावून आपण फिरलो आणि आता तिकडे जाऊन कुंभमेळ्यात अंघोळ करत आहोत. कुणालाही कुणाचे देणेघेणे नाही. श्रद्धा, अंधश्रद्धेतून बाहेर पडा. आपली डोकी नीट हलवा, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली. ते नेमकं काय म्हणाले ते पाहुयात. 

राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारं 

राज ठाकरे यांचे वक्तव्य हे श्रद्धाळू भाविकांचा अपमान करणारं आहे. हिंदू माणूस देव देवतांवर श्रद्धा ठेवणारा आहे, म्हणून दगडालाही आपण मानतो. दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करु नये. स्वच्छतेच्या मुद्द्यावर आम्हीही सहमत आहोत. राजीव गांधींपासून ते आजपर्यंत नद्या स्वच्छ झाल्या नाहीत, पण त्याच खापर काँग्रेसवर जात असल्याचे प्रविण दरेकर म्हणाले. पण देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याला प्राधान्य दिले आहे. नदी जोड प्रकल्प सिंचन गाळमुक्त धरणं असे अभिनव उपक्रम त्यांनी आणल्याचे दरेकर म्हणाले.

प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करतंय

प्रदूषण होऊ नये म्हणून हे सरकार काम करत आहे. स्वछता आणि प्रदूषणमुक्तीबाबत प्रचंड काम सुरु आहे. चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला हवं असेही दरेकर म्हणाले. कुंभमेळा ही शेकडो हजारो वर्षांची परंपरा आहे. आपण श्रद्धेवर जगत आहोत असेही दरेकर म्हणाले. 

बाळासाहेबांनी सोन्यासारखी माणसे जोडली, उद्धव ठाकरेंना टिकवता आली नाहीत

महापालिकेच्या बिलांच्याबाबत आम्ही कधी लक्ष घातलेले नाही, ज्यांच बिलांवर लक्ष असते ते बिलांच्या माध्यमातून मलिदा घेतात ते लक्ष ठेवतात असे दरेकर म्हणाले. सोन्यासारखी माणसे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना जपता आली नाहीत, त्यांनी सोन्याचा चमचा जपला असा टोला दरेकरांनी ठाकरेंना लगावला. बाळासाहेबांनी जी सोन्यासारखी माणसे जोडली ती यांनी टिकवली नाहीत, यांनी सोन्याच्या चमचावर लक्ष दिल्याचा टोला देखील दरेकरांनी नाव न घेता संजय राऊतांना लगावला. 

कितीही शिबीरं घ्या लोक एकनाथ शिंदेंसोबत जातील, ठाकरेंना टोला

ठाकरे गटाच्या शिबिरावर देखील दरेकरांनी प्रतिक्रिया दिली. मला वाटतं ही हतबल झालेली उबाठा आहे. प्रत्येक पक्ष आपला पक्ष टिकावा म्हणून प्रयत्न करत असतो. पण शेवटी पक्ष विचारांवर असतो. शिवसेनेची उभारणी मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी आणि हिंदुत्व रक्षणासाठी झाली आहे. पण तुम्ही विचार गुंडाळून ठेवला. म्हणून कितीही शिबीरं घ्या लोक एकनाथ शिंदेंसोबत जातील असे दरेकर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

BJP on Raj Thackeray : घरात बसून कुंभमेळ्याचं पाणी अस्वच्छ म्हणणं चुकीचं; राज ठाकरेंवर भाजपचा पहिला पलटवार