मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत: राज ठाकरे
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2018 12:59 PM (IST)
मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बीडमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला.
बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत, अशी कोपरखळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी बीडमध्ये आज पत्रकारांशी संवाद साधला. नोटबंदीचा निर्णय फसला तर मला भर चौकात शिक्षा द्या असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं. आता नोटबंदी फसली आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पत्र लिहून चौकात बोलावलं पाहिजे, असं टीकास्त्र राज ठाकरे यांनी सोडलं. राज ठाकरे कालपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. काल औरंगाबादनंतर आज त्यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. रुपयाच्या अवमूल्यनावरुनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. रुपयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एव्हढं अवमूल्यन झालं आहे, असं राज म्हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचा अट्टहास राजस्थान हातचे जात आहे, हे लक्षात आल्याने होत आहे. आपला पराभव झाकण्यासाठी ही खेळी सुरु आहे. भाजपाकडे पैसे अधिक आहेत, म्हणून सारख्या निवडणुका घ्यायचा का? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. ईव्हीएम नको म्हणून मी सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे. प्रत्यक्ष भेट केवळ शरद पवार यांची घेतली, असं राज यांनी सांगितलं. तरुणांचा ओढा शहराकडे आहे. शेतीच्या दुरवस्थेमुळे तरुणांना शेती करावीशी वाटत नाही, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं. काठमांडूत 'बिम्सटेक' संमेलनाला सुरुवात, मोदीही उपस्थित