या चाचणीत 12.5 किमीचा मार्ग हा दैनंदिन प्रवासासाठी तयार असल्याचं निष्पन्न झालं आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनीही या मार्गासाठी हिरवा कंदिल दिल्यामुळे लवकरच नगर-बीड-परळी या मार्गावरून रेल्वेनं प्रवास करता येणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात या रेल्वे मार्गासाठी सर्वाधिक 780 कोटींची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पहिल्या वर्षी 159 कोटी, दुसऱ्या वर्षी 300 कोटी आणि आता 780 कोटींची तरतूद रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. याशिवाय राज्य सरकारचा वाटा या तरतुदी व्यतिरिक्त असणार आहे.
अहमदनगर ते परळी दरम्यानच्या जवळपास सर्व ठिकाणच्या रेल्वे पुलांचं काम पूर्ण झालं असून भरावाचं कामही पूर्ण होत आलं आहे. तर अहमदनगर ते नारायणडोह या पहिल्या टप्प्यातील पंधरा किलोमीटरवर रेल्वे रूळ देखील अंथरून झाले आहेत.
दरम्यान यापूर्वी या मार्गावर रेल्वे इंजिन धावताना पाहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नगर-दौंड महामार्गावर हा रेल्वेमार्ग महामार्गास छेदतो. तेथून हे रेल्वे इंजिन धावलं होतं.