नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्र प्रकरणी सुरु असलेल्या कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी ही वेळकाढूपणा प्रक्रिया सुरु असल्याचे प्रथम दर्शनी दिसत असल्याचे मत व्यक्त केले.  त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर ठाकरे गटाने सडकून टीका केली आहे. सुप्रीम कोर्टाने आज राहुल नार्वेकरांची कानशिलात सुजवली आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी हल्लाबोल केला. 


त्यामुळे कोर्टाने श्रीमुखात भडकावली, शुद्धीवर या असं सांगितलं 


खासदार अरविंद सावंत (Arvind sawant On Rahul Narvekar) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने केवळ नाराजी व्यक्त केली नाही, तर कानशिलात सुजवली. गाल लाल केले. कोर्टाने सणसणीत लगावली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांनी संविधान आणि लोकशाही पायदळी तुडवायची ठरवलं होतं, त्यामुळे कोर्टाने श्रीमुखात भडकावली. शुद्धीवर या असं सांगितलं. इतकं चिडलेलं सुप्रीम कोर्ट गेल्या दहा वर्षात कुणी पाहिलं नसेल. विधानसभा अध्यक्ष हे भारतीय जनता पक्षाचे गुलाम आहेत. त्यांच्या इशाऱ्यावर चालतात. इतके महिने तुम्ही केले काय? असा प्रश्न कोर्टाने विचारला, यात आणखी काय पाहिजे? निवडणुका येतीलच आता महाराष्ट्रातील जनतेने अशांना त्यांची जागा दाखवली पाहिजे, असं अरविंद सावंत म्हणाले.


विधानसभा अध्यक्षांना कायदा समजत नसेल तर त्यांना बसून समजावा लागेल


दरम्यान, महाराष्ट्रामध्ये (Maharashta Political Crisis) सुरू असलेल्या राजकीय खेळखंडोबावर आज सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढत अक्षरशः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची खरडपट्टी केल. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांची खरडपट्टी करताना तुम्ही पोरखेळ चालवला आहे का? अशा शब्दात कानउघडणी केली.इतकच नव्हे तर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करताना तुम्ही आमच्या आदेशाची पायमल्ली करत आहात अशा शब्दात सुनावले. अॅडव्होकेट सिद्धार्थ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये सरन्यायाधीश यापूर्वी इतके संतापल्याचे नमूद केले. विधानसभा अध्यक्षांना कायदा समजत नसेल तर त्यांना बसून समजावा लागेल अशा शब्दात राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले.



सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या वकिलांना सांगितलं की येत्या 17 तारखेला म्हणजे मंगळवारी तुम्ही परत या आणि आम्हाला एक नवीन रुपरेषा द्या. कारण हा पोरखेळ चालू आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हणाले. विधानसभा अध्यक्षांनी जे वेळापत्रक दिलं आहे ते कोर्टाला मान्य नाही. कोर्ट म्हणालं की तुम्ही आमच्या आदेशाची पायमल्ली करताय. अध्यक्षांना जर नियम समजत नसतील तर वकील तुषार मेहता आणि महाराष्ट्राच्या अॅडव्होकेट जनरल यांनी अध्यक्षांसोबत बसावं आणि त्यांना समजवावं की सुप्रीम कोर्ट काय आहे आणि आमचे अध्यक्ष पाळले गेले पाहिजेत, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना सुनावलं. 


सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आमचे आदेश पाळले गेले पाहिजेत आणि त्याचबरोबर राहुल नार्वेकर यांच्याकडून जे वेळापत्रक देण्यात आले त्याला सुद्धा एक प्रकारे केराची टोपली दाखवली आहे. येत्या मंगळवारपर्यंत वेळापत्रक निश्चित करून या, जर वेळापत्रक निश्चित होत नसेल तर आम्हाला दोन महिन्यांचा कालावधी नाईलाजास्तव द्यावा लागेल, असा स्पष्ट शब्दात इशारा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिाल. आपण इलेक्शनसाठी थांबला आहात का? अशी सुद्धा विचारणा यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली. हे प्रकरण फक्त शिवसेनेसाठी मर्यादित नसून तर राष्ट्रवादीच्या आमदार संदर्भातील सुद्धा वेळापत्रक देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेतत. विधानसभा अध्यक्षांचे वकील अॅडव्होकेट तुषार मेहता यांनी आम्ही मंगळापर्यंत नवीन वेळापत्रक आणू, अशी माहिती  दिली. 


इतर महत्वाच्या बातम्या