PM Narendra Modi Visit in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आज त्यांच्या उपस्थितीत पी एम विश्वकर्मा योजनेचा (PM Vishwakarma Scheme) वर्षांपूर्ती सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यात राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे  उपस्थित असणार आहेत. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. यावेळी कारागिरांच्या चित्र प्रदर्शनीचे देखील आयोजन करण्यात आलं आहे.


वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन


दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावती येथील पी एम मित्रा पार्कचे ई भूमिपूजन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा शुभारंभ होणार आहे. वर्ध्याच्या स्वावलंबी मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. पी एम विश्वकर्मा योजनेच्या 18 लाभार्थ्यांना या योजनेचा प्रातिनिधिक स्वरुपात लाभ दिला जाणार आहे. 


अमरावतीमध्ये मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क घोषित, आज ई भूमिपूजन होणार


पीएम मित्रा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने अमरावतीमध्ये मेगा इंटीग्रेटेड टेक्सटाईल पार्क घोषित केला आहे. देशात सात शहरांत अशाप्रकारचे पार्क होणार असून यामध्ये अमरावतीचा समावेश आहे अमरावतीच्या प्रकल्पात 10 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यात तब्बल 3 लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याने मोठ्या प्रमाणावर रोजगार विदर्भातील युवकांना मिळणार आहे. नांदगाव पेठ औद्योगीक वसाहती जवळील हा प्रकल्प होणार आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून आज दुपारी 12 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ई भूमिपूजन होणार आहे. 


प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वर्ध्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव देण्यासह कर्जमाफी आणि दूध दराचे भाव वाढवावा यासाठी  शेतकऱ्यांनी आंदोलन केले आहे. त्यासाठी वर्ध्याच्या गोपुरी चौक येथे शेतकाऱ्यांकडून हातात पोस्टर घेत आंदोलन करण्यात आले आहे. विविध मागण्यांचे पोस्टर घेत शेतकरी आंदोलनाला बसले आहे. शेतकऱ्यांना 24 तास विजमाफी द्यावी, अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, सोयाबीनला 10 हजार तर  कापसाला 15 हजार रुपये भाव देण्याची मागणी केली आहे. शेतमालाला भाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातत्याने महाराष्ट्रात दौरे सुरु


मागच्या काही दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातत्याने महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची वर्षपूर्ती साजरी करत आहे. सोबत इतर इतर विकासकामांचा शुभारंभ करत आहे.सहा दिवसानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परत महाराष्ट्र्र येत असून 26 सप्टेंबरला पोहरादेवी येथे विकास कामाचे लोकार्पण करणार आहे. वरवर बघता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दौरे होत आहे असे दिसत असले तरी 2024 च्या निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हनंतर भाजपपासून दूर गेलेल्या मागासवर्ग मतदारांना परत भाजपसोबत जोडण्याची सुरुवात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपासून भाजप करत असल्याचे दिसत आहे. यात ओबीसी, आदिवासी, दलित, वर्गांचा समावेश आहे. पीएम विश्वकर्मा योजनेत या वर्गातील मोठ्या संख्येने लाभार्थी शासकीय योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे भाजप या वर्गावर लक्ष ठेवून आहे. त्यासाठी आजचा कार्यक्रम महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या दृट्टीने अत्यंत महत्वाचा मनाला जात आहे. यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून 10 वाजून 45 मिनिटांनी पंतप्रधान कार्यक्रम स्थळी पोहोचणार आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Subhadra Yojana: PM मोदींच्या वाढदिवशी 'या' महिलांना मिळणार खास गिफ्ट, खात्यात येणार 10,000 रुपये, जाणून घ्या काय आहे योजना?