Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीला सुरुवात; हिंगोलीत 64 पदांसाठी 13600 अर्ज, बीडमध्ये174 जागांसाठी 8134, तर अमरावतीत 214 जागेसाठी 22 हजार अर्ज
Maharashtra Police Recruitment: भरती प्रक्रियेत उंची आणि छाती मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर प्रथमच केला जाणार असल्याने, अचूक मोजणी होणार असल्याने, उमेदवारांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका कुशंका राहणार नाही.

हिंगोली: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीला (Maharashtra Police Recruitment) सुरूवात झाली आहे. जागा कमी असल्या तरी अर्जदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याचं चित्र दिसून येत आहे. हिंगोली पोलीस दलामध्ये 64 पदांसाठी पोलीस भरती होणार असून आज या पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात झाली असून हिंगोली शहरातल्या संत नामदेव कवायत मैदानावर ही भरती प्रक्रिया (Maharashtra Police Recruitment) सुरू होणार आहे. 64 जागांसाठी 13600 उमेदवारांनी अर्ज केले असून ही भरती प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी हिंगोली पोलिसांच्या वतीने 200 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, आज पहाटे चार वाजल्यापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आज मैदानी चाचणीसाठी 900 उमेदवारांना बोलवण्यात आले असून 6 मार्च पर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार आहे. सर्व भरती प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेरे असो यासह व्हिडिओ कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये केली जात असून कोणत्याही भूलथापा आणि अमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये असं आव्हान पोलिसांच्या वतीने करण्यात आलेलं आहे. (Maharashtra Police Recruitment)
Maharashtra Police Recruitment: जळगावमध्ये १७१ जागासाठी १२००० उमेदवारांचे अर्ज
जळगाव पोलिस दलाच्या १७१ जागासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने,पोलिस प्रशासनाने ही भरती प्रक्रिया सुरळीत पानाने होण्यासाठी आपल्या यंत्रणा सज्ज केल्याचं पाहायला मिळत आहे. १७१ जागांसाठी असलेल्या या भारतीसाठी तब्बल १२००० उमेदवारांनी आपले अर्ज भरले असल्याने, या सर्व उमेदवारातून १७१ उमेदवार निवडताना पोलिस यंत्रणेचा ही कस लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैर व्यवहार होणार नाही यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी कॅमेरे लावले असून प्रत्येक उमेदवाराच्या कामगिरीवर कॅमेऱ्याच्या द्वारे नोंद केली जाणार असल्याने, भरती प्रक्रिया सुरळीत पार पडेल असा विश्वास पोलिसांना आहे. या भरती प्रक्रियेत उंची आणि छाती मोजण्यासाठी अत्याधुनिक यंत्राचा वापर प्रथमच केला जाणार असल्याने, अचूक मोजणी होणार असल्याने, उमेदवारांच्या मनात निर्माण होणाऱ्या शंका कुशंका राहणार नाही,असा विश्वास पोलिस दलाकडून व्यक्त केला जात आहे.
Maharashtra Police Recruitment: अमरावतीत आजपासून पोलीस भरती, 214 जागेसाठी 22 हजार अर्ज
अमरावती जिल्ह्यासह राज्यातील तरुणाईचे लक्ष लागून राहिलेल्या अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरतीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर झाला आहे. अमरावती ग्रामीणमधील 214 पदांसाठी तब्बल 22 हजार जण मैदानात उतरणार असून आजपासून ही संपूर्ण प्रक्रिया अमरावती येथील जोग स्टेडियम याठिकाणी पार पडत आहे. सुरुवातीला दररोज 800 आणि टप्प्याटप्प्याने दररोज 2000 उमेदवारांची चाचणी घेतली जाईल. पोलिस अधीक्षक कार्यालयाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, अर्जाच्या अवाढव्य संख्येमुळे ही प्रक्रिया चोख नियोजनात पार पडणार आहे.
Maharashtra Police Recruitment: बीड पोलीस दलातील 174 जागांसाठी 8134 उमेदवार
बीड पोलीस दलात रिक्त असलेल्या 174 जागांसाठी उद्यापासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. याच अनुषंगाने जिल्हा पोलीस दलाकडून तयारी करण्यात आली. यावर्षी होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पुढाकार घेतलाय. कोणत्याही उमेदवाराने स्टेरॉईडचा वापर करू नये तसेच नोकरी लावून देण्याच्या आमिषास बळी पडू नये असे आवाहन केले आहे. 174 जागांसाठी डिसेंबर महिन्यात अर्ज मागविण्यात आले होते. एका जागेसाठी सुमारे 46 जणांनी अर्ज केले असून यासाठी 8134 उमेदवार भरतीसाठी मैदानात उतरणार आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया होणार असून यासाठी पोलीस दलाकडून तयारी करण्यात आली. धावणे, गोळा फेक, या मैदानी चाचणीचा समावेश आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरे आणि हॅन्ड कॅमेऱ्याची विशेष नजर राहणार आहे.
Maharashtra Police Recruitment: वाशिममध्ये ४८ जागांसाठी ९९२६ अर्ज
वाशिम जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील ४८ रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची मोठी गर्दी होत आहे . या भरतीसाठी एकूण ९९२६ अर्ज प्राप्त झाले असून, ११ फेब्रुवारीपासून शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुलासह विविध मैदानांवर सराव करणाऱ्या युवक-युवतींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळ, सायंकाळ उमेदवार सर्व प्रकारच्या शारीरिक तंदुरुस्तीच्या चाचण्यांचा कसून सराव करताना दिसत आहेत. लेखी परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध झाल्याने उमेदवारांचा आत्मविश्वास वाढला असल्याचं दिसत आहे.























