बीड : माझ्या बापाला काही झालं असेल तर मी त्याचा जीव घेईन. त्यासाठी मला कुठल्या तपास यंत्रणेची गरज नसल्याचं वक्तव्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे. बीडमध्ये एका सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला.


दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचंही विरोधक राजकारण करत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली. लुच्च्या लबाड लोकांना आता गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमध्येही संधी दिसत आहे. मुंडे साहेबांची हत्या झाली, त्यामुळे पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा, असं बोलण राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांना शोभतं का? अशा शब्दात पंकजा मुंडेंनी जयत पाटलांचा समाचार घेतला.


मी मुंडे साहेबांची लेक आहे. मुंडे साहेबांना काही झालं असतं आणि ते मला माहीत असतं, तर तसं करणाऱ्याचा जीव घेण्याची ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. त्यासाठी मला कोणत्याही तपास यंत्रणेची गरज नाही, असा संताप पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.


गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूच्या चार वर्षांनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना यात राजकारण दिसत आहे आणि त्यासाठी तुम्हाला पंकजा मुंडेंचा राजीनामा हवा आहे. तुम्हाला पंकजा मुंडेची एवढी भीती का वाटते? असा सवालची पंकजा मुंडेनी विरोधकांना विचारला.


मी एक आवाज दिला तर मुंबईपासून दिल्लीपर्यंत माझे सगळे लोक माझ्या पाठिशी उभे राहतील. माझ्या लोकांनी लाठ्या-काठ्या खाव्यात, तुरुंगात जावं यासाठी हे लोक तुम्हाला भडकवत आहेत. मात्र तुम्ही अशा कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, असं आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना केलं.


मी सीबीआय ऑफिसर नाही, मी हॅकर नाही, मी मुंडे साहेबांची लेक आहे. मात्र माझ्याविरोधात सुरु असलेलं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रानं याआधी पाहिलेलं नाही. आज तुमच्या पायाखालची जमीन सरकली म्हणून तुम्ही मुंडे साहेबांच्या नावानं राजकारण करत आहात. तुमचे बोलवते धनी कोण आहे आहेत, हे देखील सर्वांना माहीत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.


व्हिडीओ