PM Modi Speech Highlights In Navi Mumbai :  महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज नवी मुंबईत विविध प्रकल्पांचे उद्घाटन, भूमिपूजन केले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राज्यातील आठ प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचे नवे पर्व ठरणाऱ्या मुंबई-न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंक अर्थात अटल सेतूचे (Atal Setu) उद्घाटन करण्यात आले.  


त्यानिमित्ताने नवी मुंबई विमानतळ मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या जाहीर सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती मात्र आता प्रकल्पाची चर्चा होत असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणातून आगामी 2024 च्या निवडणुकांचे रणशिंगच फुंकले आहे. 


पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे : 


> विकासासाठी आपण समुद्राच्या लाटाना देखील टक्कर देऊ शकतो. मी सांगितले होते लिहून ठेवा देश बदलणार आणि जरूर बदलणार. ही मोदींची गॅरंटी होती आणि विकास काम पूर्ण करणे ही मोदींची गॅरंटी आहे, 


> केंद्र सरकारने जी महिला सक्षमीकरण अभियानाची गॅरंटी दिली. ती योजना राज्य पुढे घेऊन जात आहे. 


> माता भगिनीचे जीवन सुखकर व्हावे यासाठी आम्ही काम करतोय. गर्भवती महिला नोकरी करणारी महिला त्यांच्यासाठी सुट्टी असो, सुकन्या योजना अशा अनेक योजना सुरू केल्यात. 


> 2014 च्या निवडणुकी आधी मी रायगड किल्ल्यावर गेलो होतो त्यावेळी काही संकल्प मी केले होते.आज ते संकल्प पूर्ण होताना मी बघत आहे. 


> अटल सेतू त्याचाच एक भाग आहे. मागच्या 10 वर्षात भारत बदलला आहे याची चर्चा होत आहे. 10 वर्षांपूर्वी हजारो करोडच्या घोटाळ्याची चर्चा होत होती. मात्र आता प्रकल्पाची चर्चा होत आहे. 


> मागील 10 वर्षात लोकांनी आपली स्वप्ने प्रत्यक्षात उतरताना पाहिली आहेत. 


> अटल सेतू हा लोकांमध्ये चर्चेचा विषय आहे. मागील काही दिवसांपासून या कामाचे कौतुक देशभरात होत आहे. वेळेत या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले. या कामासाठी जपानची मोठी मदत झाली. माझे दिवंगत मित्र, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांचे स्मरण करत आहे.


> अटल सेतू हे विकसित भारताचे चित्र आहे. विकसित भारत कसा असणार ही त्याची झलक आहे.


> वंदे भारत ट्रेन सुरू झाली. अनेक मेगा प्रोजेक्ट्स सुरू झाले काही पूर्ण होत आहेत. काही काळात मुंबईकरांना बुलेट ट्रेन मिळणार आहे. 


> काही लोकाची निष्ठा ही आपल्या फक्त तिजोरी भरण्यासाठी आहेत आणि परिवार वाढवण्यासाठी असते.  


> आमच्या सरकारचा हेतू, नियत स्पष्ट आहे. आमच्या सरकारची निष्ठा फक्त देशाप्रती आहे. 


> भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून मोदींची गॅरंटी सुरू झाली आहे. जिथे मोदींची गॅरंटी सुरू होते तिथे दुसऱ्यांची संपते.