मुंबई : राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्या दृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. ज्या उद्योजकांना त्यांच्या उद्योगाच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणे शक्य आहे तिथे त्यांनी त्याचे वेळीच नियोजन करावे व ज्या उद्योजकांना ते शक्य नाही त्यांनी कंपनीच्या आसपासच्या परिसरात अशी जागा शोधून कामगारांची तिथे राहण्याची व्यवस्था करावी असे देखील ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे चर्चा करून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कोरोनासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सचे पदाधिकारी, बाल टास्कफोर्सचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या दोन लाटेमधील हा काळ हा संयम आणि शिस्तीसाठी महत्वाचा आहे. या काळात कोरोनाची रुग्ण संख्या कमी होऊन आपण काही प्रमाणात आर्थिक व्यवहार सुरु करत असलो तरी अतिशय सावधगिरीने पुढे जाण्याची गरज आहे. उद्योग आणि आर्थिक चळवळ सुरु राहण्यासाठी कामगारांचे येणे जाणे हे त्यांच्या कामाचे ठिकाण आणि घरापर्यंतच मर्यादित राहणे गरजेचे आहे.
नियमांचे काटेकोरपणे पालन करा, अजुन कोरोनाची दुसरी लाट पुर्णत्वाने ओसरलेली नाही. परंतु याही स्थितीत कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन आपण हळुवारपणे काही आर्थिक उपक्रम सुरु करत आहोत. हे करतांना सावधगिरीची पाऊले म्हणून जे निर्बंध लावण्यात आलेले आहेत. ते कागदावर राहणार नाहीत, ते काटेकोरपणे अंमलात येतील, कुठेही गर्दी होणार नाही, सभा समारंभ होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ऑक्सिजनच्या तयारीचाही आढावा घेतला. त्यांनी ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन साठा आणि रुग्णसंख्या वाढल्यास करावयाची पूर्वतयारी या सर्वच प्रक्रियेतील वेग देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
खासगी रुग्णालयांनी लसींचे डोस वाढवून मागावेत : टोपे
चाचण्या वाढवणे, गृह विलगीकरण कमी करणे हे पॉझिटिव्हीटी रेट जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी महत्वाचे असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. त्यांनी राज्यातील खासगी रुग्णालयांनी लसीचे डोस वाढवून मागितल्यास राज्यात लसीकरणाला आणखी वेग देता येईल, त्याकडे लक्ष वेधले.