Pandharpur Varkari Pesion Scheme : मुंबई : विठुरायाच्या नामाचा गजर करत राज्यभरातील लाखो पावलं पंढरीच्या (Pandharpur News) दिशेनं मार्गक्रमण करत आहेत. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता फक्त आणि फक्त आपल्या माऊलीच्या भेटीच्या ओढीनं ही पावलं मैलोन् मैलचं अंतर पार करत पंढरीकडे चालत आहेत. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadhi Ekadashi 2024) अनेक पालख्या पंढरीच्या वाटेवर आहेत. आता याच माऊलीच्या भक्तीनं न्हाऊन निघालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. राज्यातील वारकऱ्यांना आता पेन्शन मिळणार आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनेमुळे राज्यभरातील लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 


विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांना राज्य सरकारनं मदतीचा हात देऊ केला आहे. परंपरेनं महिन्याची वारी करणाऱ्या राज्यातील वारकऱ्यांना वृद्धापकाळात वारकरी पेन्शन मिळणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळच्या (Mukhyamantri Varkari Sampradaya Mahamandal) वतीनं शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. वारकरी महामंडळाचं मुख्यालय हे पंढरपुरात असणार आहे. प्रशासकीय सेवेतील अधिकारी किंवा निवृत्त अधिकाऱ्यांची महामंडळावरती व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. तसेच, महामंडळाचं भाग भांडवल 50 कोटी इतक असणार आहे. तसेच, कीर्तनकारांना आरोग्य विमा कवचही दिलं जाणार आहे. 


अर्थसंकल्पात घोषणा, आषाढीपूर्वीच शासन निर्णय 


राज्य सरकारकडून अर्थसंकल्पात वारकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली होती. राज्यात वारकरी मंडळ स्थापन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती. अर्थसंकल्पात घोषणा केल्यानंतर आषाढी एकादशीच्या आधीच शासन निर्णय काढून राज्य सरकारनं अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून 'मुख्यमंत्री वारकरी महामंडळा'ची स्थापना करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय पंढरपुरात असणार आहे. 


महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये वारकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण केलं जाणार आहे. तसेच, वारकऱ्यांना पेन्शन लागू केलं जाणार आहे. या महामंडळाच्या माध्यमातून पंढरपूरच्या विकासाला देखील गती येईल. अशा अनेक मुद्द्यांच्या आधारे हे महामंडळ निर्माण करण्यात आलं आहे. या महामंडळांबाबत नुकतंच वारकरी संप्रदायाच्या वतीनं राणा महाराज वासकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं आहे. मुख्यमंत्र्यांकडून वारकरी महामंडळाच्या आदेशाची प्रत वारकऱ्यांना देण्यात आली आहे. 


मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या महत्त्वाच्या योजना कोणत्या? 



  • सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा आणि सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.

  • आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.

  • वारकरी भजनी मंडळाला भजन आणि कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.

  • कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.

  • पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.

  • चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


वयोवृद्धांना सरकारकडून 'खास गिफ्ट'; मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेची घोषणा, पात्रता काय? कुणाला मिळणार लाभ? A to Z माहिती एका क्लिकवर