Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह आज मुंबईत (Mumbai) आणण्यात येणार आहेत. शिवसेनेची टीम समन्वयासाठी श्रीनगरमध्ये दाखल झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील, योगेश कदम मुंबई विमानतळावर उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वतः सर्व यंत्रणासोबत समन्वय साधत आहेत.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राज्यातील 6 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे पार्थिव आणि नातेवाईकांना पुन्हा राज्यात आणण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः यासंदर्भात बारकाईने आढावा घेत असून मार्गदर्शन करत आहेत. श्रीनगर येथे या पर्यटकांचे पार्थिव आणि त्यांच्या नातेवाईकांना विमानात बसवून देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. तर मुंबईत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत.
पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून
दरम्यान, श्रीनगरमध्ये अडकलेल्या इतर पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी शिवसेनेची एक टीम अद्यापही श्रीनगरमध्ये तळ ठोकून आहे. या घटनेतील संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर-मुंबई एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान आज दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी मुंबईला निघेल. तर पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव संध्याकाळी 6 वाजता निघणाऱ्या विमानाने पुण्यात आणले जाईल. तर डोंबिवलीचे रहिवासी असलेल्या हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन येणारे विमान 1 वाजून 15 मिनिटांनी निघून मुंबईला पोहोचेल.
दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय. तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या: