नागपूर:  शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असं आवाहन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते नागपुरात बोलत होते.


“शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे हे आम्ही मान्य करतो. मात्र, त्यामागे अनेक वर्षांचे चुकीचे सरकारी धोरण आणि सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती कारणीभूत आहे. केंद्र सरकारचं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लक्ष आहे. अनेक उपाय योजले जात आहेत. लवकरच शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळेल” असे गडकरी म्हणाले.

नरेंद्र मोदीच पंतप्रधान

यावेळी नितीन गडकरींनी सध्याच्या राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं.

“पुढील निवडणुकीतही भाजप विकासाच्या मुद्द्यावरून मागे हटणार नाही. आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी हेच देशाचे पंतप्रधान बनतील”, असा दावा गडकरींनी केला.

विरोधीपक्षांचे नेते आधी एकमेकांचे तोंड पाहत नव्हते. तेच आमच्या ताकतीमुळे एकत्रित येत आहेत. त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाले आहे. मात्र लोकसभा निवडणुकांच्या आधी जागा वाटपाच्या मुद्द्यावरुन, तसेच नेता निवडीच्या मुद्द्यावरुंन या ऐक्याचा पोळा फुटेल, असं भाकीतही गडकरी यांनी व्यक्त केलं.

मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कामगिरीची माहिती देण्यासाठी आज नितीन गडकरी यांनी नागपुरात पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.

शेतकरी आंदोलनाचा दुसरा दिवस

राष्ट्रीय किसान महासंघाच्या शेतकरी संपाचा आज दुसरा दिवस आहे. शेतकऱ्यांकडून शेतमालाची विक्री बंद असल्याने भाजीपाला महागला आहे. किसान महासंघाच्या घोषणेप्रमाणे राज्यातले शेतकरी 10 जूनपर्यंत संपावर असतील. या संपात देशभरातील सुमारे 120 शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.

या शेतकरी संपाला महाराष्ट्रातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहरी भागातही याचा परिणाम जाणवू लागला आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपाला गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

पुढील दहा दिवस हा संप जर सुरु राहिल्यास भाजीपाल्याचे दर गगनाला भिडतील आणि त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या जीवनावरच होणार आहे. त्यामुळे या संपावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी भाजी व्यापारी करत आहेत.

संबंधित बातम्या

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाजीपाल्याचे दर दुप्पट! 

शेतकरी संपावर, आजपासून 10 दिवस संप!  

सध्या शेतकरी संप नको, नुकसान शेतकऱ्यांचंच : राजू शेट्टी