पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीची धक्कादायक रितीने झालेल्या झीज प्रकरणाचे वास्तव एबीपी माझाने समोर आणल्यावर आज शासनाने यासाठी तातडीची बैठक घेतली. विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज भारतीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पुरातत्व विभाग, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मंदिर समितीसह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिराचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या सोबत तातडीची ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत भारतीय पुरातत्व विभाग, महाराष्ट्र पुरातत्व विभाग यांनी देशभरातील तज्ज्ञांशी चर्चा करुन मूर्तीची अल्पावधीत झीज का होत आहे याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात पुरातत्व विभागाने सुचवलेले बदल आणि होणारे नित्योपचाराची पद्धत याबाबत पुरातत्व विभागाने आपली परखड मते मांडली. येत्या दोन दिवसात पुन्हा भारतीय पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ येऊन विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची पाहणी करुन झीज होण्याची करणे आणि उपाययोजना याचा अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर करणार आहेत. यानंतर नीलम गोऱ्हे या पुन्हा या तज्ज्ञासोबत मंदिराची पाहणी करुन उपाययोजनांबाबत मंदिर समितीला सूचना करणार आहेत. आता पुन्हा एकदा या अहवालानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुरातत्व विभाग लेपन करणार आहे. मात्र यावेळी पुरातत्व विभागाकडून केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन मंदिर समितीस करावं लागणार आहे. यामध्ये गाभाऱ्यातील ग्रॅनाईट, प्रखर दिवे हटवणे जेणेकरुन गाभाऱ्यात थंडावा राहिल, नित्योपचारात दही, दूध आणि इतर रासायनिक क्रिया घडविणाऱ्या पदार्थांचा कमीतकमी वापर करणे असे उपाय असणार आहेत. याशिवाय विठ्ठल-रुक्मिणी गाभाऱ्यात वारंवार होणाऱ्या फूल आणि फळांच्या सजावटीमुळे गाभाऱ्यातील दमटपणा वाढत जातो जो मूर्तीसाठी घातक ठरत आहे. 


अल्पावधीतच  पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीवरील वज्रलेप निघू लागल्याचे एबीपी माझाने 11 एप्रिल रोजी समोर आणलं होतं. त्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी तातडीची बैठक घेणार असल्याचं सांगितलं होतं. वास्तविक लॉकडाऊन सुरु असताना 23 आणि 24 जून 2020 रोजी पुरातत्व विभागाकडून विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीला वज्रलेप करण्यात आला होता. पुरातत्व विभागाने विठ्ठल आणि रुक्मिणी मूर्तीच्या पायावर सिलिकॉनचे लेप दिले होते. हा लेप पुढील 7 ते 8 वर्षे तसाच राहिल असा दावा करण्यात आला होता. परंतु दोन वर्षांनंतर विठुराया आणि रुक्मिणी मातेच्या पायावरील दर्शन 2 एप्रिलपासून सुरु करण्यात आले. मात्र यावेळी मूर्तीच्या पायाची मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याच्या तक्रारी भाविकांतून करण्यात आल्या. 


याचं वास्तव काल एबीपी माझाने दाखवल्यावर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची गांभीर्याने दाखल घेत तातडीने बैठक बोलावणार असल्याचं सांगितलं होतं. रुक्मिणी मातेच्या पायावरील झालेली झीज ही धक्कादायक असून या संदर्भात पुरातत्व विभागाशी तातडीने संपर्क साधून दुरुस्ती करणार असल्याचे औसेकर यांनी सांगितलं होतं. मूर्तीचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी पुरातत्व विभाग सुचवेल त्या पद्धतीने तातडीने उपाययोजना करणार असल्याचेही औसेकर यांनी सांगितलं. त्यानुसार आज ही बैठक पार पडली. भारतीय पुरतत्त्व विभाग आणि महाराष्ट्र पुरातत्त्व विभाग एकत्रित पाहणी करुन मग त्यावर उपाययोजना करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.


भाविकांच्या तक्रारी
दरम्यान आज देखील भाविकांनी मूर्तीच्या पायाची झालेल्या झीजबद्दल एबीपी माझाशी बोलताना नाराजी व्यक्त केली. काही महिला वारकरी भाविकांनी तर रुक्मिणीच्या पायाला झालेल्या जखमा तातडीने दुरुस्त करा अशा भाषेत नाराजी व्यक्त केली. तर काही भाविकांनी ही झीज थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. 


विठूरायाची वालुकाष्म दगडापासून बनवलेली मूर्ती असून ती 'नाही घडविला नाही बैसविला' अशी स्वयंभू असल्याचे वारकरी संप्रदायाचे मानणं आहे. पूर्वी वारंवार होणाऱ्या पंचामृताच्या अभिषेकाने या मूर्तीची झीज होत असल्याचे वास्तव एबीपी माझाने दाखवल्यानंतर देवावरील हे अभिषेक बंद करण्यात आले होते. मात्र तरीही मूर्तीची झीज होत असल्याने तिच्यावर आतापर्यंत चार वेळा वज्रलेप करण्यात आले होते. रुक्मिणी मातेची मूर्ती ही गंडकी पाषाण म्हणजेच शाळीग्राम दगडाची असून ती अतिशय गुळगुळीत आहे. मात्र या मूर्तीच्या पायाची झीज मोठ्या प्रमाणात होत असल्याने या पायावर दरवेळी वज्रलेप केला जात असतो. आता पायावर दर्शन सुरु होऊन केवळ दहाच दिवस झाले असताना रुक्मिणी मातेच्या पायावरील वज्रलेपाचे तुकडे पडल्याने पायाची दूरवस्था झाली आहे. आता इतक्या कमी वेळात दर्शन बंद असताना या दोन्ही मूर्तींची झीज कशामुळे झाली याचा पुरातत्व विभागाला अभ्यास करावा लागणार. ही झीज रोखण्याचे मोठे आव्हान आता पुरातत्व विभागासमोर उभं राहिलं आहे.