Raju Shetti : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आळशी म्हणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच खरे साखर उद्योगाचे लाभार्थी असल्याचे वक्तव्य माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलं आहे. शरद पवारांचे राजकारण हे साखर उद्योगावर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनेक साखर कारखाने असल्याचे शेट्टी म्हणाले. तर हरभरा, केळी, हळद, ऊस, कापूस या पिकात उसापेक्षा जास्त पैसा मिळतो. पण उसात शाश्वत पैसा मिळतो म्हणून शेतकरी ऊस पीक घेतो असेही शेट्टी म्हणाले. त्यामुळे शरद पवार व नितीन गडकरी यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांविषयी असं बोलणं चुकीचं असल्याचे शेट्टी म्हणाले.


महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का?


जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करुन दंगली घडतील असे जाणीवपूर्वक वक्तव्य केलं जात आहे. राज्यातील वातावरण खराब करुन अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळं महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का? असा प्रश्न पडला असल्याचे शेट्टी म्हणाले. जनतेचे दैनंदिन जीवनातील प्रश्न, रोजगाराचे प्रश्न दुर्लक्षित राहत असतील तर हा पुरोगामी महाराष्ट्र नाही असेच म्हणावे लागेल. त्याचप्रमाणे दिवस दिवस शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, त्यामुळं उभे पिके करपतात, उभा ऊस जळून जातो हे प्रश्न महत्वाचे असल्याचे शेट्टी  म्हणाले. तापमान वाढीमुळे केळी पिकाचे मोठे नुकसान होतेय, रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढीने मशागत खर्च वाढला, गाळप हंगाम संपत आला तरी शेतकऱ्यांचा ऊस अद्याप शेतात उभा आहे यावर कुणी बोलायला तयार नसल्याचे शेट्टी म्हणाले.


राज ठाकरे व महाविकास आघाडी यांची नुराकुस्ती


हनुमान चालीसावरुन चाललेले राजकारण म्हणजे राज ठाकरे व महाविकास आघाडी यांची नुराकुस्ती आहे. इंधन दरवाढ, गॅस दरवाढ, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महागाई यावर चर्चा होऊ नये असे केंद्रात सत्तेत असणाऱ्याना वाटत आहे. त्यामुळे हे वादंग आता निर्माण केलं जात आहे. तर भारतीय जनता पार्टी नेहमी शेतकरी विरोधी धोरणे राबवते, त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी काही देणेघेणं नसल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. राजकीय आणि धार्मिक ध्रुवीकरण करुन राजकीय पोळी भाजण्याचा केंद्रातील भाजप सरकार आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न असल्याचेही शेट्टी म्हणाले.


दरम्यान, ज्या गोष्टीसाठी मी महाविकास आघाडीत सामील झालो त्या आघाडीने शेतकऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समितीतील मतदानाचा अधिकार काढून घेतला. तसेच भूमी अधिग्रहण कायद्याची मोडतोड करुन शेतकऱ्यांना मिळणारा सत्तर टक्के मोबदला या सरकारने कमी केला. तसेच शेती व सहकारा संदर्भातील सर्व निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच घ्यायला लागलेय, ज्यात इतर पक्षांना लक्षात घेतले जात नसल्याचे शेट्टी म्हणाले.