Nawab Malik Allegations : ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यात बराच गदारोळ सुरु झाला आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर एनसीबी आधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबईत एन्ट्री घेतल्यानंतर विविध ड्रग्ज प्रकरणं समोर येत आहेत. त्यातच आर्यन खानला अटक केल्यानंतर या प्रकरणाला वेगळ वळण मिळालं. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक दररोज नवनवीन खुलासे करत आहेत. सोमवारी त्यांनी सकाळी ट्वीट करत मोठा खुलासा केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा ड्रग्ज पेडलरसोबतचा फोटो पोस्ट करत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. 'चला, आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या कनेक्शनवर चर्चा करुयात.' असं कॅप्शन नवाब मलिक यांनी दिलं आहे. 


राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी साधला निशाणा-


राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी रविवारी सायंकाळी हा फोटो पोस्ट केला होता. भाजपचं ड्रग्ज नेक्सस असं ट्वीटमध्ये निशांत वर्मा यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस यांच्यासोबत फोटो असणाऱ्या व्यक्तीचं नाव जयदीप चंदूलाल राणा असल्याचा दावा त्यांनी केलाय. जयदीप चंदूलाल राणा हा ड्रग्ज पेडलर असून एनसीबीने जून 2021 मध्येच त्याला अटक केली असल्याचा दावा निशांत वर्मा यांनी आपल्या पोस्टमध्ये केलाय. भाजपचं आणि जयदीप चंदूलाल राणा यांचं कनेक्शन काय? असा सवालही यावेळी उपस्थित केलाय. 


अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी निशांत वर्मा यांनी पोस्ट केलेला फोटो पोस्ट केला असून 'चला, आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुयात.' असं कॅप्शन दिलं आहे. समीर वानखेडे यांच्यानंतर नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. रविवारी घेतेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 






काय म्हणाले होते नवाब मलिक?
नीरज गुंडे हा मागील सरकारचा दलाल आहे, हा दलाल माझ्यावर आरोप करतोय. ज्याच्या चेंबूरच्या घरी माजी मुख्यमंत्री जाऊन बसायचे. ज्याला मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये थेट जायला मिळायचं. सगळ्या विभागाच्या सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये याचं जाणं येणं  होतं. वर्षावर हा कायम फिरत असायचा. रश्मी शुक्लाच्या प्रकरणात देखील गोंधळ घालत होता. महापालिकेत वारंवार जात होता. हाच दलाल आता समीर वानखेडे यांच्या कार्यालयात जाऊन तासनतास बसत असतो. हा तिथं का बसत असतो? त्याच्या मागे एक कारण आहे. कारण काशिफ खान, मोहित कंबोज, कॉर्डियला क्रूझ याचा एकमेकांशी संबंध आहे. ही बाब मी लवकरच समोर आणणार आहे. त्यानंतर भाजपच्या लोकांना राज्यभरात तोंडं दाखवायची लायकी उरणार नाही. आशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नीरज गुंडे यांना फटकारलं.