कांद्याच्या दरात मोठी घसरण, उत्पादन खर्चही निघेना, शेतकरी संघटना आक्रमक, 1500 रुपये अनुदान देण्याची मागणी
सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटता आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
Nashik onion Price : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटता आहेत. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. उत्पादन खर्चही निघने कठीण झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. असातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. कांद्याच्या घसरत्या दराविरोधात नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं. कांद्याला 1 हजार 500 रुपये अनुदान देण्याची मागणी केली आहे.
कांद्याच्या दरात सातत्याने घसरत असल्यामुळं शेतकरी संघटना आक्रमक
कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज विंचूर येथे उपबाजार समितीसमोर नाशिक–छत्रपती संभाजीनगर राज्य मार्गावर रास्ता - रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलना दरम्यान, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात संताप व्यक्त केला. सध्या कांद्याला उत्पादन खर्चापेक्षाही कमी दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळं कांद्याला तात्काळ पंधराशे रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे, तसेच कांद्याला समांतर बाजार भाव योजना लागू करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
साधारणत: गेल्या दोन महिन्यांत कांद्याचे दर क्विन्टलला 800 रुपयांनी घसरले आणि नाशिक जिल्ह्यात आंदोलनाचे सत्र सुरू झाले. लाल कांद्याची आवक वाढलेली असताना देशांतर्गत घटलेली मागणी आणि थंडावलेली निर्यात घाऊक बाजारातील दरावर प्रभाव पाडत आहे. उशिराच्या खरीपापाठोपाठ (लेट खरीप) लवकरच उन्हाळी कांदा बाजारात येण्यास सुरुवात होईल. वेळीच उपाययोजना न झाल्यास दरात चढ-उताराची भीती शेतकरी वर्गासह बाजार समित्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नाही
कांद्याचा लागवडीचा हंगाम हा 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारी असतो. मात्र, यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आणि नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यामुळे कांदा रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे लागवडीसाठी रोपांचा तुटवडा जाणवत आहे. कांदा बियाणांचे दर प्रतिकिलो 2500 ते 3000 रुपये आहेत. एकरी तीन किलो बियाणे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवडीचा खर्चसुद्धा निघत नसल्याने आता कांदा लागवड करणे शेतकऱ्यांना परवडत नाही. अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. सोलापूर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी खरीप आणि लेट खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून पिकविलेला कांदा मातीमोल झाला आहे.
कांद्याचा दर सध्या 8 ते 10 रुपये प्रतिकिलोवर
सध्या कांद्याचे दर कमी असून, काढणीनंतर जेव्हा कांदा विक्रीसाठी बाजारात येतो, तेव्हा अनेक वेळा बाजारभावात खूप घसरण होते. यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही मिळणे कठीण झाले आहे. यापूर्वी काही ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी 40 रुपये किलो असलेला कांद्याचा दर सध्या 8 ते 10 रुपये प्रतिकिलोवर आला आहे.
























