नाशिक: नाशिक शहरांतून गेल्या काही दिवसांपासून मुलींच्या अपहरणांच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. आज एकाच दिवशी तब्बल सहा मुलींचे अपहरण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.


नाशिकमध्ये गुन्हेगारी कमी होण्याचं नाव घेत नाही. एकीकडे पोलीस धडक कारवाया करत आहेत तर दुसरीकडे त्याच दुप्पट गतीने नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत आहे. अशातच मुलींचे अपहरण ही चिंतेची बाब ठरत आहे. रोज एक ना एक मुलीचे अपहरण नित्याचे झाले आहे. आज तर तब्बल सहा मुलींचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भीती आहे.


पहिली घटना नाशिक शहरातील शालिमार येथे घडली असून मुलीच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार त्यांची मुलगी शालिमार येथील श्वेता बॅगल्ससमोर उभी असताना अज्ञात इसमाने तिला पळवून नेल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे.


तर भद्रकाली परिसरात अपहरणाची दुसरी घटना घडली. जीपीओ पाठीमागील पंचशील नगर येथून आईच्या जवळून सदर मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची फिर्याद भद्रकाली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.


अपहरणाचा तिसरा प्रकार शहरातील राणाप्रताप चौकाजवळ घडला. फिर्यादी महिलेने म्हटले की 15 वर्षीय मुलगी क्लासला गेली, ती अजून आलीच नाही, त्यामुळे कुणीतरी फूस लावून पळवून नेले म्हणून अंबड पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. चौथा प्रकार हा अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतच घडला. अंबड येथील स्वामीनगर येथे राहणाऱ्या मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याचे फिर्याद करण्यात आली आहे.


अपहरणाची पाचवी घटना लेखानगर परिसरात घडली आहे. आईने दिलेली फिर्यादीत म्हटले आहे की, मुलीला सकाळी कॉलेजला जाण्यासाठी रिक्षात बसवून दिले होते, मात्र कॉलेजची वेळ संपूनही ती अद्याप घरी न आल्याने अपहरणाची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सहावी घटना भगूर परिसरात घडली. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार भगूर येथील शाळेत मुलीला पाठविले असता शाळा सुटुनही ती घरी परतली नाही, सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नसल्याने अपहरणाची फिर्याद देवळाली कॅम्प पोलिसांत करण्यात आली आहे.


अपरणांच्या घटनांत वाढ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातून अपरणांच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी निर्भया पथक नेमले आहे. मात्र अशा पद्धतीने मुलींचे अपहरण होत असतांना पथक करतंय असा सवाल सध्या उपस्थित होतो आहे.