नाशिक अपघातात सहा भाविकांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची माहिती
सप्तशृंग गड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. यात सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केली आहे.
Nashik Accident : नाशिक (Nashik) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सप्तशृंग गड येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात झाला आहे. सप्तशृंग गडावरील घाट रस्त्यावरुन इनोव्हा कार (एम.एच.15 बी.एन.0555) हजारो फूट खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. इनोव्हा कारमध्ये पिंपळगाव चिंचखेड येथील भाविक होते. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दु:ख व्यक्त करत मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या अपघातातील भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तिथे सज्ज
नाशिक जिल्ह्यात सप्तश्रृंगी गडावरुन एक वाहन कोसळून झालेल्या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू असून संपूर्ण यंत्रणा तेथे सज्ज ठेवण्यात आली आहे. या भाविकांच्या वारसांना 5 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अपघातातील मृतांची नावे
१ ) कीर्ती पटेल
२ ) रसीला पटेल
३ ) विठ्ठल पटेल
४ ) लता पटेल
५ ) पचन पटेल
६ ) मणिबेन पटेल
कारचालकाचे नियंत्रण सुटून कार सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळली
गणपती घाटाच्या पुढे पिंपळगाव येथील इनोव्हा कंपनीची कारचालकाचे अचानक नियंत्रण सुटून सुमारे 800 ते 1000 फूट दरीत कोसळल्याने कारमधील एकाच कुटुंबातील 6 भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. पिंपळगाव येथील पटेल कुटुंबीय हे सप्तशृंग गडावर दर्शन घेऊन परतत असतांना हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथके, स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल असल्याने बचाव पथकाला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. अंगावर काटा आणणारे हे दृश्य होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथानपणा, घाटरस्त्यावर योग्य दुरुस्ती नसल्याने, तसेच सुरक्षितेच्या कुठल्याही उपाययोजना नसल्याने अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी यावेळी केला. पोलिसांनी मृतांच्या ओळखीची प्रक्रिया सुरू केली असून मृतदेह ताब्यात घेत शव विच्छेदनासाठी पुढे पाठवले आहे. या घटनेने पिंपळगाव व सप्तशृंगगड परिसरात शोककळा पसरली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळेच ही घटना घडली असून सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सप्तशृंग गड ग्रामपंचायत उपसरपंच संदिप बेनके व ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























