मुंबई : काँग्रेस नेते नारायण राणेंच्या सोमवारी सिंधुदुर्गातील शक्तीप्रदर्शनानंतर सभेत 21 तारखेला पुढील घोषणा करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे शुक्रवारी ते भाजप प्रवेशाबाबत घोषणा करतील, अशी अशा व्यक्त होत आहे. पण त्याऐवजी राणे स्वत:चा पक्ष स्थापन करतील, त्यासाठी भाजप त्यांना सहकार्य करेल, अशी शक्यता आहे.


वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशावरुन विविध तर्क लढवले जात आहेत. कारण, त्यासाठी त्यांनी अहमदाबादमध्ये अमित शाह यांची घेतलेली भेट. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री फडणवीस आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाच्या काळात राणेंच्या गणपती दर्शनामुळे, त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.

पण राणेंच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपमधील एक गट राणेंच्या पक्ष प्रवेशावर फारसा अनुकुल नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये, असे अनेकांचे मत आहे.

दुसरीकडे कालच्या सभेत नारायण राणेंनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दल भाष्य न करता, नव्या पक्ष उभारणीचे संकेत दिले आहेत. त्यासाठी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केलं आहे.या निमित्त ते पक्ष उभारणीसाठी चाचपणी करत असल्याचं जाणवतं.

या निवडणुकीत राणेंच्या ‘समर्थ’ पॅनेलला घवघवीत यश मिळाले, तर भाजपकडून पुढील पक्ष बांधणीसाठी राणेंना सर्वोतोपरी मदत मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील महादेव जानकर, विनायक मेटे यांसारखे नेते आपापल्या पक्ष आणि संघटनेच्या माध्यमातून आमदार नसतानाही सत्तेचा लाभ घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच नारायण राणे नवीन पक्षाची स्थापना करतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.