मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे समर्थकांचा वरचष्मा असलेली जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर नारायण राणे चांगलेच दुखावले आहेत. संतापलेले राणे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शक्तीप्रदर्शन करणार आहेत.


कुडाळमध्ये राणे आपल्या समर्थकांना संबोधित करतील. त्यामुळे आजच्या भाषणात राणे नेमकं काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  तत्पूर्वी भाजपच्या वाटेवर असलेल्या राणेंनी दसऱ्यापूर्वीच सीमोल्लंघनाचे संकेत दिलेत.

अशोक चव्हाणांवर हल्लोबल

नारायण राणेंचे समर्थक असलेल्या सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर, राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्ला चढवत, दसऱ्यापूर्वी सीमोल्लंघन करणार असल्याचा सूचक इशारा दिला.

एबीपी माझाशी बोलताना राणे म्हणाले की, नातवाच्या वाढदिवसादिवशी सीमोल्लंघन करत आहे. नवरात्रीत याचा शेवट करेन. सिंधुदुर्गात जाऊन पुढील रुपरेषा ठरवणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

राणेंनी कार्यकारिणी बरखास्तीवरुनही अशोक चव्हाणांवर जोरदार हल्ला चढवला. “नांदेडमध्ये काँग्रेस संपली, जे नांदेडमध्ये काँग्रेस सांभाळू शकत नाहीत, ते राज्य काय सांभाळणार?’’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला.

याशिवाय मोहन प्रकाश आणि अशोक चव्हाण हे काँग्रेस संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोपही राणेंनी केला.



संबंधित बातम्या
दसऱ्याआधी सीमोल्लंघन करणार : नारायण राणे

राणेंचे कुरघोडीचे सर्व आरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी फेटाळले