नागपूर भीषण स्फोट प्रकरण! मृतदेहांची ओळख पटवणं कठीण, प्रत्येक मृत कामगाराची डीएनए चाचणी होणार
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. यामध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
Nagpur SBL Company Blast : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे आज (1 मार्च 2026) सकाळच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये मोठा स्फोट झाल्याची घटना घडलीय. बारुद आणि त्यापासून डेटोनेटरसह इतर स्फोटक बनवणाऱ्या कंपनीत हा मोठा स्फोट (SBL Blast Update) झालाय. दरम्यान या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा वाढला आहे. (Nagpur SBL Company Blast News) आतापर्यंत या भीषण स्फोटत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटातील प्रत्येक मृत कामगाराची डीएनए प्रोफाइल चाचणी होणार आहे. ही प्रक्रिया दोन दिवसात पूर्ण होईल अशी शक्यता आहे.
सर्व मृतकांचे शरीर जळून गेल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण
नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी राऊळगाव येथील एसबीएल एनर्जी कंपनीत झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली. यावेळी नागपूरचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनिक अधिकारी उपस्थित होते. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास एसबीएल एनर्जी लिमिटेड या कंपनीमध्ये झालेल्या स्फोटात 17 कामगारांचा मृत्यू झाला होता. तर 24 कामगार गंभीर जखमी झाले होते. सर्व मृतकांचे शरीर जळून गेल्यामुळे मृतदेहांची ओळख पटविणे कठीण जात आहे... त्यामुळे प्रशासनाने सर्व मृतांची डीएनए प्रोफाइलिंग चाचणी करण्याचे निर्णय घेतले असून त्यासाठी अनेक कामगारांच्या नातेवाईकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. डीएनए प्रोफाइलिंग चाचणी दोन दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे तोवर सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शीतगृहात ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जखमी झालेल्या कामगारांवर नागपुरातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर सर्व मृत कामगारांचे पार्थिव वैद्यकीय आणि उत्तरीय तपासणीसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ॲम्बुलन्सद्वारे आणण्यात आले आहे.
स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत. मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत 18 जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
























