कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत, उलट त्यांच्याकडूनच टोल वसुली, मनसे आक्रमक, MSRDC आणि IRB च्या अधिकाऱ्यांना विचारला जाब
मुंबई पुणे महामार्गावर कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत, उलट त्यांच्याकडूनच टोल वसुली केली आहे. या मुद्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे.
Mumbai Pune Expressway : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर तीन आणि चार फेब्रुवारी रोजी टँकर उलटून झालेल्या भीषण वाहतूक कोंडीबाबत MSRDC तसेच IRB Infrastructure या टोल वसुली करणाऱ्या कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने जाब विचारला आहे. येत्या चार दिवसांत संबंधित अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही, तर मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील टोल नाके बंद पाडल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी किंवा प्रसाधनगृह अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत
ज्वलनशील वायू वाहून नेणारा टँकर घाटामध्ये उलटल्याने मुंबई व पुणे दोन्ही दिशांना प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अन्न, पाणी किंवा प्रसाधनगृह अशा कोणत्याही मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या नाहीत. उलट, अत्यंत निर्लज्जपणे या प्रवाशांकडून टोल वसुली करण्यात आली असा आक्षेप मनसेने घेतला आहे. आपत्तीच्या काळात जर प्रशासन प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देऊ शकत नसेल, तर मग ही टोल वसुली नेमकी कशासाठी केली जाते? असा सवाल उपस्थित केला. या थेट प्रश्नावर MSRDC आणि IRB चे अधिकारी निरुत्तर झाल्याचे मनसे कडून सांगण्यात येत आहे.
32 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला
32 तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या हजारो प्रवाशांचा अमूल्य वेळ वाया गेला. त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला, आर्थिक नुकसान झाले, लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल झाले. या सर्व नुकसानीची भरपाई शासन किंवा प्रशासन करणार आहे का? असा प्रश्न मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस आरिफ शेख, माऊली थोरवे, हेमंत पाटील, उपाध्यक्ष रवी शेलार, सुनील अंधारे पाटील, रमाकांत साळवे यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway Traffic) टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल 32 तास लोक या वाहतुक कोंडीत अडकलेली होती. यानंतर मोठा हाहाकार माजला होता. त्यानंतर हा टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झाली. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारकडून मिसिंग-लेन तयार करण्यात येत आहे. मात्र याही मिसिंग लिंक प्रकल्पाची (Mumbai-Pune Expressway Missing Link) अनेक डेडलाईन पार होताना पाहायला मिळतेय.























