मुंबई : वीजदरवाढ सरकार करत नाही, मुळात कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे. भाजपमधील सर्वात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भर विधानसभेतच सरकारची कानउघडणी केली. त्यानंतर बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.


मी विदर्भातील मंत्री म्हणून विदर्भाकडे जास्त बघतो हा आरोप चुकीचा असल्याचा दावा बावनकुळेंनी केला. उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्राला वीज कनेक्शन देणार नाही, असं नाही. जळगाव जिल्हा आणि शहरासाठी वेगवेगळ्या योजनांमधून आपण निधी देत असल्याचंही बावनकुळे म्हणाले. जून 2017 पर्यंत जळगावमधल्या पायाभूत सुविधा पूर्ण करुन खडसेंच्याच हस्ते उद्घाटन करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं.

राज्यात 1700 कोटींची वीज बिल थकीत आहे. सध्या तरी मुख्यमंत्र्यांनी वीज कनेक्शन कापू नये, असे आदेश दिले आहेत. परंतु आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. बागायतदार आणि निर्यातदार शेतकऱ्यांबाबत वेगळा निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी दिले.

कोणतीही वीजदरवाढ झालेली नाही. वीजदरवाढीबाबत पेपरमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. मुळात मी म्हणजे सरकार दरवाढ करत नाही. MERC म्हणजे महाराष्ट्र वीज नियामक आयोग ही दरवाढ करते, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. वीज दरवाढ करण्याबाबत सध्या फक्त मागणी केलेली आहे. अद्याप आदेश दिलेले नाहीत, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं.

खडसेंनी फडणवीस सरकारला झाप झाप झापलं!


ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भात 24 तास वीज कनेक्शन देता, जळगावला 14 हजार शेतकऱ्यांनी पैसे भरले, मात्र अजून कनेक्शन का नाही, असा सवाल खडसेंनी विचारला.

निवडणुकीत आश्वासन दिलं होतं 24 तास वीज देऊ. पण वीज मुबलक नाही. आपलं सरकार आलं, पण आपण शब्द पाळला पाहिजे, असा खणखणीत सल्लाही खडसेंनी दिला.

शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का. अधिकाऱ्यांना जाऊन सांगा, रात्री शेतात काही पेरता येतं का, असंही खडसे म्हणाले.

शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन सरकारने द्यावं, असंही खडसे म्हणाले.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. पोलीस प्रशिक्षण केंद्राचं भविष्य काय, होणार की नाही. 15 – 15 वर्ष वाट बघायला लावू नका, असाही सल्ला खडसेंनी केला.

राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय? उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एक कारखना उभा राहिला का याची माहिती द्यावी, असे खणखणीत सवाल, खडसेंनी विचारले.

एकनाथ खडसे यांचे घायाळ करणारे पाच प्रश्न

  1. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही काय फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का? विदर्भाच्या शेतकऱ्याला 24 तास वीज, मग अन्य शेतकऱ्यांना का नाही?

  2. शेतकऱ्याला रात्री 8 वाजता वीज देता, मात्र शेतकऱ्याने रात्रीच शेतात जायचं का, रात्रीची पेरणी करता येईल का?

  3. शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्याचं वीज बिल थकलं असेल, तर व्याज माफ करा, दंड माफ करा. वीज कनेक्शन कट करणार नाही, असं आश्वासन देणार का?

  4. राज्यभरात औद्योगिक क्षेत्रात किती गुंतवणूक झाली? मुंबई पुणे, नाशिक कॉरिडॉर वगळता उद्योगांची स्थिती काय?

  5. उत्तर महाराष्ट्रात एखादं तरी युनिट आलं का , एखादा कारखना उभा राहिला का?