गडचिरोली : भारताच्या इतिहासातलं नक्षलवाद्यांच्या विरोधातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन गडचिरोलीत झालं आहे. गेल्या 48 तासात आतापर्यंत 37 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलं आहे. इंद्रावती नदीत आणखी पंधरा नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत.


नदीत आढळलेले सर्व मृतदेह पोलिसांनी बाहेर काढले. पोलिसांनी नक्षलवाद्यांवर हल्ला चढवत पहिल्या कारवाईत 16 जणांचा खात्मा केला होता, या हल्ल्यात जखमी अवस्थेत पळून जात असलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह नदीत आढळले.

गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठं ऑपरेशन पार पाडत, काल राजाराम खानाला परिसरात सहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. राजाराम कोरेपल्ली जंगलात हे ऑपरेशन पार पडलं. महत्त्वाचं म्हणजे, या ऑपरेशनमध्ये नक्षलवाद्यांचा कमांडर नंदू याला ठार करण्यात जवानांना यश आलं.

पहिल्या ऑपरेशनमध्ये सोळा नक्षलवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत रविवारी पहाटे 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आलं. डीव्हीसीचे सदस्य असलेले साईनाथ आणि सिनू या दोघांनाही ठार मारण्यात आलं. राज्यातील ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जाते. भामरागड तालुक्यातील ताडगाव जंगल परिसरातील पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली.

43 वर्षांचा सिनू हा मूळ वारंगलचा असून त्याचं खरं नाव विजयेंद्र राऊते. सुरुवातीला तो आंध्र प्रदेशमध्ये कार्यरत होता. 2003 मध्ये गडचिरोलीत तो दाखल झाला.

अनेक जबाबदाऱ्या पार पाडत काही वर्षांपासून तो दक्षिण गडचिरोली डिव्हीजनचा सचिव झाला. सिनूची पत्नीही नक्षल चळवळीत असल्याची माहिती आहे. मात्र ती पैसे घेऊन पळाल्यामुळे चळवळीत त्यांच्याविरोधात असंतोष होता.

साईनाथ हा पेरीमिली दलम कमांडर, त्याला डिव्हीजनल कमिटी सदस्य बनवण्यात आलं होतं. साईनाथ अत्यंत सक्रिय होता. त्याचं वय 35 वर्षांच्या घरात होतं. सातत्याने गडचिरोलीत होत असलेल्या अनेक नक्षली कारवाया आणि हत्याकांडाचा तो सूत्रधार होता.

संबंधित बातम्या :

गडचिरोलीत 48 तासात दुसरं ऑपरेशन, 6 नक्षलवाद्यांचा खात्मा


आमदारांवर हल्ल्याची तयारी, त्याआधीच पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा खात्मा


गडचिरोलीत पोलिसांच्या चकमकीत 13 माओवाद्यांना कंठस्नान