Monsoon News : राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळं उष्णतेपासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं काही ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. तर काही ठिकाणी विजेचं खांब देखील कोसळले आहे. दम्यान, पुढील पाच दिवसात राज्याच्या विविध भागात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या 24 तासात कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.


पुढच्या 24 तासाचा अंदाज काय?


पुढच्या 24 तासात दक्षिण कोकणसह गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे, तर घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं सांगितला. तसेच विदर्भातही काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


पुढच्या 48 तासात मान्सून राज्यातील विविध भागात आगेकूच करणार


पुढच्या 48 तासात मान्सून राज्यातील विविध भागात आगेकूच करण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शुक्रवारी तळकोकणात दाखल झालेल्या मान्सूननं रायगडसह पुण्यापर्यंतचा भाग व्यापला आहे. या पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला आहे. उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. काल कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात जोरदार पाऊस झाला. त्याचबरोबर, पालघर, मुंबई, कोल्हापूर या भागात जोरदार पाऊस झाला आहे. मोसमी पाऊस दाखल झाल्यानं कोकण आणि मुंबई परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. पुढील दोन दिवस कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून, उर्वरित सर्व महाराष्ट्रात पुढील पाच दिवसात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


पावसामुळं बळीराजा सुखावला


पावसाचं आगमन झाल्यामुळं शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळं पेरणीपूर्व कामांना वेग येमार आहे. राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाचं आगमन झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत. त्यामुळं आणखी चांगला पाऊस झाल्यास शेतकरी खरीपाची पेरणी करणार आहेत.
 
 महत्वाच्या बातम्या: