मुंबई : प्रकल्पग्रस्त व आगरी, कोळी बांधवांचे ज्येष्ठ नेते दि. बा. पाटील यांच्या सन्मानार्थ "दि.बा.पाटील फेलोशिप" अर्थात पाठ्यवृत्तीची आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी घोषणा केली. फेलोशिपच्या पोस्टरचे अनावरण राज ठाकरे यांनी केले. या उपक्रमातून महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर अभ्यास होईल, हा सर्व अभ्यास महाराष्ट्रासमोर यावा अशी सूचना यावेळी राज ठाकरे यांनी संयोजकांना केली आहे. तसेच या उपक्रमास मनापासून शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी या फेलोशिपचे समन्वयक नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यासह रायगड जिल्हाअध्यक्ष अतुल भगत, नवी मुंबई उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे उपस्थित होते. 


दि.बा.पाटील साहेबांच्या कार्याला सलाम करण्याच्या हेतूने ही फेलोशिप सुरू केल्याचे या प्रकल्पाचे मुख्य समन्वयक आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दि.बा यांचा वारसा सर्व स्तरातील सर्व समाजातील युवकांपर्यंत विविध माध्यमातून पोहोचविणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य समजतो असे देखील राजू पाटील यांनी म्हटले आहे.


नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कल्याण येथील शहरी ग्रामीण भागात आगरी कोळी समाजाच्या प्रश्नांबरोबर विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. त्या प्रश्नांवर अभ्यासपूर्ण संशोधन व्हावे, ते प्रश्न सोडविण्याचा समाजातील सर्वच संघटनांना त्याचा लाभ व्हावा. या प्रश्नांच्या अभ्यासाचा दस्तऐवज तयार व्हावा या उद्देशानेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही पुढाकार घेऊन लोकनेते दि. बा. पाटील पाठ्यवृत्ती (फेलोशिप) सुरू करीत असल्याचे आमदार राजू पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 


येत्या काही दिवसांत पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजू पाटील व तज्ज्ञांची एक समिती पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या फेलोशिपबाबत सविस्तर माहिती देणार असल्याचे या फेलोशिपचे समन्वयक नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे. तसेच फेलोशिपचे मानधन किती असेल, एकूण किती अर्जदार निवडले जातील, निवड प्रक्रिया काय असेल, अर्ज करायची मुदत काय असेल, फेलोशिपसाठी वयोमर्यादा व फेलोशिपसाठी अर्ज करण्याचे वेळापत्रक याबाबत सर्व माहिती पत्रकार परिषदेमधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या फेलोशिपबाबत अर्ज करण्यासाठी लवकरच एक संकेतस्थळ देखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. लोकनेते दि.बा.पाटील यांच्यावर असलेले प्रेम व त्यांच्या कार्याप्रती असलेला आदर व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेला हा प्रयत्न असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: