Amol Mitkari : महाराष्ट्र विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. उद्या राज्याचे मुख्यमंत्री व वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस हे विधानसभेत अर्थसंकल्प मांडणार आहेत. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने काही कठोर निर्णय कालबाह्य योजना बंद करणे किंवा त्यात काळानुरूप बदल करण्याचे सुतोवाच ते अर्थसंकल्प मांडताना करतील, अशी शक्यता आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यामुळं अर्थमंत्रीपदाची जबाबदारी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. दरम्यान, यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांनी व्यक्त केल्या आहेत. 

नेमकं काय म्हणाले मिटकरी?

उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होईल, पण यंदाचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अजितदादा विना आहे. वर्षानुवर्षे ज्यांच्या अभ्यासू आणि ठाम नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जायचा, त्या अजितदादांची उणीव उद्या संपूर्ण राज्याला जाणवेल. कागदावर आकडे असतील, योजना असतील; पण दादांची दृष्टी, धडाडी आणि अनुभव यांची कमतरता मात्र उद्या दिसणार. दादाविना अर्थ नसलेला अर्थसंकल्प अशा शब्दात अमोल मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

आगामी वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज

 
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. महायुती सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे या संकल्पामध्ये महाराष्ट्रााच्या जनतेला काय काय मिळणार आहे, याकडे सगळ्यांचं लक्ष्य लाागलं आहे. अर्थसंकल्पाच्या आदल्यादिवशी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला आहे. आगामी वर्षात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. आर्थिक अहवालामध्ये चालू आर्थिक वर्षात 7.9 टक्क्यांनी वाढणार,  असा अंदाज वर्तवला आहे. हा अंदाज  राष्ट्रीय सरासरीपेक्षा म्हणजे 7.4 पेक्षा जास्त आहे.