निवडणूक निकाल २०२६
(Source: ECI/ABP News)
ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी
एबीपी माझा वेब टीम | 19 Jul 2018 11:24 AM (IST)
‘सरकार बरोबर चर्चा सुरु असल्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नका. जनावरांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करु नका’, असे आवाहन राजू शेट्टींनी आंदोलकांना केले.

मुंबई : राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली. सरकार जो पर्यंत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत कायदा हातात न घेता आंदोलन सुरुच राहणार असल्याचे राजू शेट्टींनी सांगितले. ‘सरकारबरोबर चर्चा सुरु असल्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नका. जनावरांना इजा होईल असे कोणतेही वर्तन करु नका’, असे आवाहन राजू शेट्टींनी आंदोलकांना केले. बुधवारी रात्री सरकारबरोबर विविध मागण्यांवर बराच वेळ चर्चा झाली. त्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करणं हाच पहिला पर्याय असल्याचे सांगण्यात आले असं राजू शेट्टी म्हणाले मी सध्या नागपूरहून चर्चेसाठी निमंत्रण येतंय का याची वाट बघत असल्याचे शेट्टींनी सांगितले. बाहेरच्या राज्यातलं दूध महाराष्ट्रात येतं, ते इथे परवडतं कारण बाहेरच्या राज्यातल्या दुधाला सबसिडी मिळते. जोपर्यंत दूध दरवाढीवर ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कायदा हातात न घेता आंदोलन सुरु राहिल असे राजू शेट्टींनी सांगितले. दूध आंदोलनच्या मागण्या कमीत कमी 25 रुपये दर देणाऱ्या दूधसंघाला सबसिडी देण्याबाबतचा प्रस्ताव सरकारला देण्यात आला आहे. ज्यावेळी व्यवसायात मंदी असते त्यावेळी दूधपावडर निर्माण करणाऱ्या कंपन्यांकडून निश्चित दर ठरवला पाहिजे. हा दर कमीतकमी 25 रुपये असावा अशी मागणीही केली आहे. आंदोलकांवर पोलिसांकडून अत्याचार राज्यभरात अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यात अनेक खोटे गुन्हे देखील दाखल केले आहेत. कार्यकर्त्यांच्या घरात घुसून महिला- वयस्कर व्यक्तींना धमक्या देणे, अश्लील बोलणे, असे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरेप राजू शेट्टींनी केला आहे. सरकारला कार्यकर्त्यांवरील गुन्हेमागे घेण्याची विनंती करू. पण गुन्हेमागे घेण्यासाठी आंदोलन गुंडाळणार नाही, असेही ते म्हणाले. गुन्हेमागे घेण्याची घोषणा करूनही सरकार गुन्हेमागे घेत नाही. हा आजवरचा अनुभव असून त्याचा मी सुद्धा बळी आहे. त्यामुळे लोक वर्गणीतून कार्यकर्त्यांच्या केसेस लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मनसेनचा पाठिंबा परराज्यातून येणाऱ्या दूधाला मनसेनचा विरोध आहे म्हणूनच तयांनी या आंदोलनाचा पाठींबा दिला आहे. मनसेच्या या पाठींब्याबद्दल राजू शेट्टींनी आभार मानले आहेत.