मुंबई : मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिक, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि बीडमध्ये जागरण गोंधळ आंदोलन केलं. नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या सीबीएस चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे.


मुंबई


राज्याच्या विविध भागात मराठा समाजाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मुंबईच्या आझाद मैदान येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्याकडून जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. अशोक चव्हाणांना उपसमितीवरुन हटवा, मराठा आरक्षण टिकवा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलनास परवानगी नाकारल्याने रस्त्यावरच हे आंदोलन करण्यात आलं.


पिंपरी-चिंचवड


तर पिंपरीत झोपी गेलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाबाबत सरकारने झोपेचं सोंग घेतल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पिंपरी चिंचवडच्या डांगे चौकातही मराठा समन्वय समितीकडून हे आंदोलन करण्यात आलं. सोलापुरातही मराठा समन्वय समितीच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे चौकात हे आंदोलन करण्यात आलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं. बीडमध्येही चराटा फाटा याठिकाणी मराठा समाजाच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं.


औरंगाबाद


औरंगाबादेतील क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केलं. आंदोलकांनी जागरण गोंधळ करत सरकारचा निषेध नोंदवला. विनापरवानगी आंदोलन केल्यानं पोलिसांनी 30 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतलं, तर क्रांती चौक पोलिस ठाण्यात आंदोलकांना नेण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजीही केली.


जळगाव


मराठा समाज्याच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्या, या सह 2015 मध्ये SEBC मधून नोकरीसाठी मराठा तरुणांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यात उत्तीर्ण झालेल्या तरुणांना नोकरीचे आदेशही काढण्यात आले. पण प्रत्यक्षात मात्र या तरुणांना रुजू करून घेण्यात आले नाही. या सर्व तरुणांना नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी चाळीसगाव येथील मराठा समन्वय समितीच्या वतीने समन्वयक लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागरण गोंधळ करून आंदोलन करण्यात आले.