Manoj Jarange Patil : मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक जिल्ह्यातील येवल्यात मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) टीका केली. हा भुजबळांचा कसला आलाय बालेकिल्ला. हा अठरा पगड जातीचा आणि शेतकऱ्यांचा बालेकिल्ला असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. तसेच छगन भुजबळांना गिनत नसल्याचेही मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, आचार संहिता लागण्याआधी मराठ्यांना आरक्षण द्यावेच लागेल असेही भुजबळ यावेळी म्हणाले.


आरक्षण दिल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी आचारसंहिता लावू नये 


मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये एक सुद्धा उमेदवार निवडून येवू देणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावू नये असेही जरांगे पाटील म्हणाले. पुनः एकदा त्यांना इशारा देतो, त्यांचा एक पण निवडून येवू देणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. 


मी कोणालाही तिकीट दिलं नाही. कोणाचंही नाव फायनल केलं नाही


मी कोणालाही तिकीट दिलं नाही. कोणाचंही नाव फायनल केलं नसल्याचे मनो जरांगे म्हणाले. मी कोणालाच शब्द देखील दिला नसल्याचे मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान, सरकारनं चुकीचा निर्णय घेऊ नये, याचे परिणाम वाईट होतील असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. 


दरम्यान, येवला इथं आज जरांगे पाटील समर्थक आणि छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना देखील घडली. यामुळं काही वेळ याठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूकडील समर्थकांनी घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. तसेच या ठिकाणी मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे. येवल्यात जरांगे पाटील यांच्या समर्थखांनी रास्ता  रोको केला होता. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानंतर हा रास्ता रोको मागे घेण्यात आला आहे. काही कुरबुरी झाल्या असतील तर लहान भाऊ, मोठे भाऊ म्हणून सोडून द्या. वाद घालू नका असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना हेच पाहिजे आहे, आपण शांतता राखा. तशी वेळ आल्यास मनगटाला मनगट लावण्याची पण आपली तयारी असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. जरांगे यांनी विंचूर चौफुली येथे कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.