जालना : राज्य सरकारसमोरील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) तिढा अद्याप कायम असून उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जरांगे यांनी राज्य सरकारला 13 जुलैपर्यंतचा अवधी दिला असून त्यानंतर आपण सरकारचं काहीही ऐकून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले. तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजायचं, अशा शब्दात जरांगे यांनी सरकारला इशाराही दिला आहे. उपोषणानंतर रुग्णालयात उपचार घेत असलेले मनोज जरांगे आज अंतरवाली सराटी गावात आले, त्यावेळी गावकऱ्यांना उद्देशून भाषण केलं. मी अंतरवलीत येण्यासाठी आसूसलेलो होतो, मरणाच्या शेवटच्या घटकासोबत मी समाजासोबतच राहणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले. जरांगे यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांना टोला लगावला. 


आपल्या विरोधात कितीही जातीवाद केला, कतीही टोळ्या एकत्र आल्या तरी आपण जातीवाद करायचा नाही. अंतरवलीतील सगळा समाज आपला आहे, अंतरवलीच्या आजूबाजूला जे गावं आहेत, ते आपले शिव भाऊ आहेत. आपली घडी विस्कळीत होऊ देऊ नका, तो येवल्याहून आला तो भांडण लावेल, दंगली करेल आणि निघून जाईल, असे म्हणत जरांगे यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा लक्ष्य केलं. गाव खेड्यातील ओबीसी मराठा एक आहे,  मराठ्यांनी छगन भुजबळ यांचं दंगली घडवण्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही. छगन भुजबळ, छगन भाऊ तुझा असा इंगा जिरवतो, बेट्या, तुझा टांगा उलटवणार. तू जेवढं करशील तेवढे मराठे एक होत आहेत, असे म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर पुन्हा एकदा बोचरी टीका केली. आंदोलन संपेपर्यंत थांबा, नंतर पाहुयात. आपण स्थगित केलेलं आंदोलन त्याला परवानगी नाकारली, पण त्यांच्या आंदोलनास परवागी दिली. हा जातीवाद नाही का, असा सवालही मनोज जरांगे यांनी विचारला आहे. 


एकमेकांच्या मदतीच्या भूमिकेत राहायचं


कोणता तरी नेता सांगतोय म्हणून आपण बिघडायचं आणि रोष व्यक्त करायचा. आपल्याला एकमेकांचे चेहरे बघायचे आहेत, रामराम घालायचा आहे, शेतात एकमेकांना काही अडचण आली तर मदतीला जायचं आहे याच भूमिकेत आपल्याला राहायचं आहे, असे आवाहन तुम्ही आमची भूमिका समजून घ्या, आम्ही 150 वर्षांपासून आरक्षणात आहोत, पण आम्हाला हे माहिती नव्हतं की आम्ही आहोत. आता आम्हाला माहिती झालं आहे, त्यामुळे नोंदी पाहून तुम्हीही म्हटलं पाहिजे की द्या मराठा समाजाला आरक्षण. 


तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजा


तुम्ही पलट्या मारल्या तर तुमचं सरकार म्या पलटी केलंच समजायचं. तुम्ही खोटं बोलून मला माझ्या समाजापासून तोडायचा प्रयत्न करताल. तुम्ही भाजपच्या मराठा आमदारांना, नेत्यांना बोलायला लावताल. मी समाजाला सांगतो, पहिल्यापासून मी ज्या मागण्या केल्या, त्यावरच ठाम आहे. मी कुठेही मागण्या वाढलेल्या नाहीत, असेही जरांगे यांनी म्हटले.