नवी मुंबई/ सांगली : मुंबईतील फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. फेरीवाल्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील फळे आणि भाजीपालांचा उठाव थंडावला आहे. तर सांगलीतील शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.


मनसेच्या फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनानंतर मुंबईसह उपनगरातील महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम सुरु आहे. यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातून येणाऱ्या शेतमालाच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर मोठा परिणाम झाला आहे.

एपीएमसी मार्केटमधून मुंबई आणि उपनगरात फळे आणि भाजीपाल्यांची मोठ्या प्रमाणात जावक होते. याची मदार रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाले आणि किरकोळ व्यापांऱ्यांवर आहे. मात्र, आता फेरीवाल्यांवर कारवाई होत असल्यानं शेतमालाचा उठाव कमी झाला आहे. मालाला उठाव मिळत नसल्यानं व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून फळ आणि भाजीपाला घेणं कमी केलं आहे. यामुळे किमतीही 15 ते  20 टाक्क्यांनी खाली आल्या आहेत.

दुसरीकडे या आंदोलनाचा फटका सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही बसला आहे. आंदोलनानंतर व्यापारी शेतकऱ्यांचा मालच खरेदी करत नाहीत. या कारणामुळे या शेतकऱ्यांना आपला शेतमाल परत घेऊन सांगली, कोल्हापूर मार्केटमध्ये कवडीमोल भावाने  विकावा लागत आहे.

कारंदवाडी येथील अमोल पाटील आणि प्रकाश खोत या दोन तरुण प्रयोगशील शेतकऱ्यांनी दीड एकरावर कलिंगड पिकाची लागवड केली होती. पण फेरीवाल्यांविरोधातील आंदोलनामुळे या शेतकऱ्यांच्या कलिंगडांचं मोठं नुकसान होत आहे. दर मिळत नसल्यानं अमोल पाटील आणि प्रकाश खोत यांना आपला शेतमाल शेताततच ठेवावा लागत आहे.