मुंबई : राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. असातच हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील काही भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. कोकणासह, पुणे, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, समुद्रसपाटीपासून घाटमाथ्यांपर्यंत हवामानात मोठे बदल दिसून येतील. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज कोकण परिसरात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, ठाणे, रायगड आणि पालघर या भागांमध्ये तुरळक आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत जोरदार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Maharashtra Weather Update)
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा
पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. घाटमाथ्यांवर देखील जोरदार पावसाची शक्यता आहे, महाबळेश्वर, खंडाळा, मुळशी अशा ठिकाणी पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासह काही जिल्ह्यांसाठी पावसाचा 'हाय अलर्ट' जारी केला आहे. (Maharashtra Weather Update)
लोणार तालुक्यात अचानक मुसळधार पावसाला सुरूवात झाली, बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात काल सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रा या गावात पावसाचे पाणी शिरलं. गावात पावसाचे पाणी शिरल्याने काही घरांचे हे नुकसान झाल्याची माहिती आहे.
रायगडला पावसाने झोडपलं
रायगड जिल्ह्यात काल(मंगळवारी, ता-15) दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं, यानंतर काही भागात जनजीवन विस्कळून पडले होत. नागोठणे रोहा राज्य मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प पडली होती. ही दरड देखील हटवण्यात आल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक पूर्व पदावर आली आहेत. शिवाय मुंबई गोवा महामार्गावर ठिकठिकाणी साचलेलं पाणी सुद्धा ओसरल्यानं महामार्गावरीची वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. काल सुट्टी देण्यात आलेल्या शाळा आज नेहमीप्रमाणे सुरू असणार आहे. म्हसळा तालुक्यातील ढोरजे पूल काल दिवसभर पाण्याखाली होता. मात्र आज या पुलावरचे पाणी देखील पावसाचा जोर कमी झाल्याने ओसरला आहे. एकंदरीत काल रायगड जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला होता. आज पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतंय. काल 85.56 मिलीमीटर पावसाची नोंद संध्याकाळ पर्यंत करण्यात आली होती. पूरपरिस्थिती निर्माण करणाऱ्या प्रामुख्याने ज्या नद्या आहेत, त्या सुध्दा इशारा पातळीच्या आतमध्ये असून नागरिकांना एकंदरीत दिलासा मिळाला आहे.