Maharashtra Weather : राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर (cold weather) वाढला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तापमानाचा (Temperature) पारा देखील सरासरीपेक्षा एक ते दोन सेल्सिअसने खाली आला आहे. त्यामुळं कोकणसह मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नसल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी दिली आहे. पुढच्या दोन दिवसानंतर डिसेंबरचे पहिले 10 दिवस कोकणात थंडीचा जोर वाढणार असल्याचे खुळे म्हणाले.


मध्य महाराष्ट्रात काय स्थिती दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा वाढले आहे. साधारणत: दोन ते चार अंश सेल्सिअसने तापमान वाढलं आहे. त्यामुळं या जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी जाणवणार नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मात्र, तीन डिसेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती त्यांनी दिली.


उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात थंडीचा जोर वाढणार


उत्तर महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगांव आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली. या ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्यानं नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. दुसरीकडं संपूर्ण विदर्भात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. थंडीचा परा आणखी वाढण्याची शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.


मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला


मराठवाड्यात तापमानाचा पारा घसरला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहेय तिथेही ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात आठ ते 10 अंश सेल्सिअस तापमान आहे. सात डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.


वाढत्या थंडीचा शेती पिकांना फटका  


राज्यात वाढत्या थंडीचा शेतीच्या पिकांना देखील फटका बसत आहे. थंडीचा कडाका वाढल्याने लोकांनी जागोजागी शेकोट्या पेटवल्या आहेत. दरम्यान, या वाढत्या थंडीचा शेती पिकांना देखील फटका बसत असल्याचे दिसत आहे. वाढत्या थंडीमुळं हिंगोली जिल्ह्यातील केळी उत्पादक (Banana Crop) शेतकरी चिंतेत आहेत. कारण, थंडीमुळं केळीच्या वजनात घट येत असून, केळीची वाढही कमी होत आहे. यामुळं केळीच्या उत्पन्नात तब्बल 30 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Agriculture News :  वाढत्या थंडीचा केळीच्या बागांना फटका, उत्पादनात घट होण्याची शक्यता, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत