Mumbai Pune Water Cut :  मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या (Pune) पाणीपुरवठ्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत गुरुवारी आणि शुक्रवारी (2 आणि 3 मार्च) पाणीपुरवठा विषयक दुरुस्ती कामामुळे एस आणि एन वॉर्डमधील  विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडीत करण्यात येणार आहे. तर पुण्यात देखील गुरुवारी (2 मार्च) अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा होणार नाही. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन  विभागातील नागरिकांना केले आहे. 


2 आणि 3 मार्च रोजी मुंबईतील काही भागात पाणीकपात (Mumbai Watercut) 


मुंबईकरांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी (2 आणि 3 मार्च) रोजी मुंबईतील काही भागात पाणीकपात करण्यात आली आहे. भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, पवई आणि घाटकोपर परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. महापालिकेकडून एस आणि एन वॉर्डमधील काही भागात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे लाल बहादूर शास्त्री मार्ग, घाटकोपर (पश्चिम), रमाबाई आंबेडकर नगर, शास्त्री नगर, सुभाष नगर, आंबेवाडी, सर्वोदय नगर आदी भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार  आहे. परिसरातील रहिवाशांना कपातीच्या काळात पाणी जपून वापरण्याचे  आवाहन मुंबई पालिकेने केले आहे. 


पुण्यात गुरुवारी अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद (Pune Watercut)


येत्या गुरुवारी (2 मार्च) ) पुण्यातील काही परिसरात (water supply) पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) विविध भागात फ्लो मीटर बसवण्याचे काम सुरु केले. रामटेकडी ते खराडी भागात जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसवण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने होणार पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेने दिली आहे. 


पुण्यातील 'या' भागात राहणार पाणी बंद


रामटेकडी, ससाणे नगर, हडपसर गावठाण, फुरसुंगी, सातव वाडी मगरपट्टा, वानवडी, केशवनगर मुंढवा गाव, गाडीतळ अशा मुख्य भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


पुणे महानगरपालिकेने बाधित भागातील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचा सल्ला दिला आहे आणि शटडाऊन दरम्यान महामंडळाला सहकार्य करावे. दुरुस्तीचे काम पूर्ण होताच पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. फ्लो मीटर बसवणे हा शहरातील रहिवाशांना कार्यक्षम पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी पुणे महानगरपालिकाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. हे मीटर वेगवेगळ्या भागात पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यास मदत करतील, त्यामुळे महामंडळाला पाण्याची गळती आणि अपव्यय यांसारख्या समस्या ओळखण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यात मदत होईल. मात्र या बंदचा पुणेकर नागरिकांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.