Maharashtra Rains : कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने आधीच जोरदार हजेरी लावली होती. मात्र विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील भागांमध्ये पावसाने उशिरा हजेरी लावली. गुरुवारपासून या भागांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहू लागले आहेत. काही नद्या दुथडी भरून वाहत असल्यामुळे काही गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती समोर आली आहे. विशेषतः वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. तर नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यात देखील पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे.
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात सलग काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पालखेड धरणाचा साठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. जलसाठ्यातील वाढ लक्षात घेता प्रशासनाने 14 दरवाजांपैकी 7 दरवाजे एक फूट उचलून धरणातून 5754 क्युसेक वेगाने कादवा नदीपात्रात विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या असून, संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी नदीकाठपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पैनगंगा नदीला पूर; वाशिम, बुलढाणा, हिंगोलीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
कालच्या दिवसभरातील वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आहे. नदी पात्राच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शेतीत पाणी घुसले असून, सोयाबीन, हळद यांसारखी पीके पाण्याखाली गेली आहेत. वाशिमच्या रिसोड तालुक्यात पावसाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. हजारो हेक्टर शेती पूर्णपणे खरडून गेली आहे. संत्रा, आंबा फळबागा, तसेच हळद आणि सोयाबीन पिके वाहून गेली आहेत. तर आंचळ गावात ड्रीप सिंचनाचे पाईपसुद्धा वाहून गेले आहेत. कुकसा ते मांगुळझनक मार्ग पूर्णतः बंद झाल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. काच नदीवरील पूल आणि आंचळ गावातील नाल्याचा पूल पूर्णपणे वाहून गेला आहे.
उटी गावात जीव मुठीत धरून रात्र
तर बुलढाण्यातील मेहकर आणि लोणार तालुक्यांमध्ये काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. मेहकर तालुक्यातील उटी गावाला नाल्याचे पाणी शिरल्यामुळे संपूर्ण गाव पाण्याच्या वेढ्यात सापडले होते. अनेक घरे पाण्याखाली गेली, नागरिकांनी रात्र जीव मुठीत धरून काढली. पेरणीनंतरची शेती पूर्णपणे नष्ट झाली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सायंकाळपासून पावसाने विश्रांती दिल्याने काही भागात पुराची परिस्थिती ओसरू लागली आहे. मात्र, हवामान खात्याने आज येलो अलर्ट जारी केल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनजीवन विस्कळीत
हिंगोली जिल्ह्यातही पैनगंगा नदीच्या पूरामुळे शेतीत पाणी शिरले आहे. पाण्याचा थेट फटका सोयाबीन व हळद पिकांना बसला असून, शेतकरी चिंतेत आहेत. संपूर्ण विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याला ऑरेंज अलर्ट
आज (दि. 27) रायगड, रत्नागिरी, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असल्याने या भागांसाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय उर्वरित विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये मुख्यतः हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आणखी वाचा
शाळेसाठी जीवघेणा प्रवास, यशोदा नदीच्या पुरात तीन विद्यार्थी अडकले; जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न