Maharashtra Rain : राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. काही ठिकाणी मात्र, हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, येत्या चार ते पाच दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असण्याची शक्यता असून, हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर 1 सप्टेंबपासून राज्यात पावासाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
दरम्यान, पुढच्या काही दिवस राज्यात पावसाची विश्रांती असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर दुसरीकडं आजपासून पुढील दोन दिवस विदर्भात पावासाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर इतर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. अतिवृष्टीचा मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, 1 सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढणार असल्यानं शेतकऱ्यांनी योग्य ते नियोजन करावं असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस
जूनपासून आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. नदी आणि धरणांच्या पाणी साठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. जून महिन्यात पावसानं दडी मारली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दरम्यान, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात मुसळधार पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्यानं वाहतुकीवरही परिणाम झाला होता. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे.
अतिवृष्टीचा विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फटका
अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :