(Source: Poll of Polls)
पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला, 'या' दोन जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु, शेतकरी चिंतेत
गेल्या आठ दिवसापासून राज्यात पावसानं उघडीप दिल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आजपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे
Maharashtra Rain News : गेल्या आठ दिवसापासून राज्यात पावसानं उघडीप दिल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. मात्र, आजपासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. त्यात पुन्हा एकादा पावसाला सुरुवात झाल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत. आजपासून पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा या दोन जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाची हजेरी
सोलापुरात मागील एक तासापासून तुफान पावसाला सुरुवात झाली आहे. ऐन दिवाळीत सोलापुरला मुसळधार पावसाने झोडपले आहे. शहरातील विविध भागात गेल्या तासाभरापासून पाऊस सुरूच आहे. ऐन दिवाळीत पाऊस आल्याने सोलापूरकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
सोलापूरला पावसाचा इशारा दिल्यानंतर आज धुव्वाधार पावसाची हजेरी. जिल्ह्यातील अनेक भागात आज दिवसभर आभाळ दाटून आल्यानंतर रात्रीत पावसाला सुरुवात झाली आहे.
सातारा जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
सातारा जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला होता. त्यानुसार आज सातारा जिल्ह्यात अचानक पावसानं धुमाकूळ घातला आहे. कराड शहरासह तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले आहे. विजेच्या कडकडासह पावसाची गेल्या तीन तासापासून हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर उकाड्याने हैराण नागरिकांना मिळाला थंडावा मिळाला आहे.
अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तापमानात किंचित वाढ होत असून अनेक भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान 26 अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे.
पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान
पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान विविध पिकांवर झाले आहे, विशेषतः सोयाबीन, मका, ऊस, कांदा, कापूस, मूग, उडीद आणि धान्य यांसारख्या पिकांना फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे, पिके सडली आहेत आणि काढणीला आलेली पिकेही वाया गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि ते मोठ्या संकटात सापडले आहेत. तर काही भागात पूर आल्यामुळं पिकासहीत जमिनी वाहून गेल्या आहेत.



















