Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांना शरद पवार हे जवळचे झाले असून आम्ही त्यांना दूरचे झाले असल्याची खंत शिवसेनेच्या बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी आता शरद पवार हवेत की आपले शिवसैनिक हवे याचा निर्णय घ्यायचा असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. 


सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. त्यावेळी केसरकर बोलत होते. त्यांनी म्हटले की, कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो असेही त्यांनी म्हटले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार साहेब त्यांना राजीनामा देऊ नका असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत असे त्यांनी सांगितले. 


उद्धव यांनी मन मोठं करावं


उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नसल्याचेही केसरकर यांनी म्हटले. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये असेही त्यांनी म्हटले. आमच्या मित्रपक्षाने एकनाथ शिंदे आणि आमच्या इतर नेत्यांवर भाष्य करू नये असेही केसरकर यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले. 


सुप्रीम कोर्टाचा दिलासा सर्वांना


आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांनाच दिलासा दिला असून न्यायालयाची भूमिका योग्य असल्याचं एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या मुद्द्यांना आता काही अर्थ राहिला नाही असंही ते म्हणाले. विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेऊ नये असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले की, आता विधीमंडळात अध्यक्षांची निवड झाली आहे. आतापर्यंत बहुतांश मागण्या मान्य झाल्या आहेत. अविश्वास ठराव असो वा अपात्रतेचा विषय, हे आता निकालात निघाले आहेत. अपात्रतेच्या विषयावर सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन दूर करण्यासंबंधी सुनिल प्रभू यांनी याचिका दाखल केली होती. ती आता जवळपास निकालात लागली आहे. सेनेच्या याचिकेतल्या मुद्द्यांना आता अर्थ नाही असं दीपक केसरकर म्हणाले. विधीमंडळाला अनेक दिवस अध्यक्ष नव्हते, ही बाब योग्य नव्हती. आता अध्यक्षांची निवड झाली असून सर्वांना त्यांचे आदेश मानावे लागतील अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.