CM Eknath Shinde On Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नसल्याची टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज काही वेळेच्या अंतरात दोन ट्वीट करत ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदे यांनी हल्लाबोल केला. 


उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर वार


शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर बोचरी टीका केली होती. जोडे पुसण्याची पात्रता असणारे व्यक्ती सरकारमध्ये असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. रिफायनरीच्या मुद्यावरून आंदोलकांवर होत असलेल्या दडपशाहीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली होती. महाराष्ट्राचे नागरीक, राज्यासाठी प्रकल्प हिताचा नसल्याने आम्ही नाणारचा प्रकल्प रोखला होता, असे ठाकरे यांनी म्हटले. केंद्र सरकारच्या राज्याच्या विरोधात असलेल्या प्रकल्पाला विरोध केल्याने आमचं सरकार पाडलं असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला होता. सरकार पाडल्याचा बदला घेतला जाईल असा इशाराही त्यांनी दिला होता. 






ठाकरेंवर हल्लाबोल...


उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बोचऱ्या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले की, काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. 


जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे...अशी बोचरी टीकाही शिंदे यांनी केली.


केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की अशा शब्दात ठाकरेंवर टीका केली. 


बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात 


जवळपास एक तासानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर पुन्हा वार केला. बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. पुढे त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच  नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे…या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय…गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय….


स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही, असेही त्यांनी म्हटले.