Chandrashekhar Bawankule on Sharad pawar : "देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही पवारांची (Sharad Pawar) खेळी असू शकते," असं जयंत पाटील म्हणाले होते. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या शकुनीमामासारख्या खेळीमुळे अजितदादांचा बकरा झाला, पहाटेच्या शपथविधीच्या कटात उद्धव ठाकरेंचाही हात होता असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ते नागपूरमध्ये बोलत होते. 


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शरद पवारांचं नाव घेऊन त्यांनी खेळी केली असा दावा केला. यातूनच हे स्पष्ट झालंय की बहुमत मिळालेल्या देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सत्तेत येऊ न देण्यासाठी हे केलं आहे. शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून ही खेळी करण्यात आली. शकुनीमामा सारखी दुष्ट खेळी त्यांनी केली. त्यासाठी आपल्याच घरचा ऊर्जावान कार्यकर्ता अजित पवार यांचा बळीचा बकरा करावा लागला, असे बावनकुळे म्हणाले. 


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांची घुसमट ?
आजवर आम्ही उद्धव ठाकरे यांनीच फडणवीस यांच्याविरोधात कट केला होता, असे समजत होतो. मात्र आता जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर शरद पवारही त्यामागे होते हे स्पष्ट होत आहे. पण जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे निर्दोष आहेत हे सिद्ध होत नाही. तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघेही या कटामागे होते. या प्रकरणातून शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आपली प्रतिष्ठा गमावली आहे. जर जयंत पाटील खोटं बोलत असतील तर जयंत पाटील शरद पवारांना का बदनाम करत आहेत असा प्रश्न निर्माण होतो. त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले नाही म्हणून हे होत आहे का? की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील यांची घुसमट होत आहे? असाही प्रश्न निर्माण होतो असं बावनकुळे म्हणाले. 


शरद पवारांच्या खेळीमुळे अजितदादांचा बकरा 
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी झालेली पवारांची चौकशीबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, ईडीची चौकशी काही फडणवीस अथवा बावनकुळे यांच्या सांगण्यावरून लागत नाही. तर कोणाच्यातरी तक्रारीनंतर चौकशी लागते. चौकशा चालत राहतात, महाविकास आघाडीनेही माझी चौकशी केली होती. कुठली चौकशी लागली म्हणून असे षडयंत्र केले जात नाही. त्यामुळे असे कुठले कारण होते की फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवार यांना अजित पवारांचा बळीचा बकरा करावा लागला. हे सर्व आज ना उद्या शरद पवार यांना जनतेला सांगावं लागेल की त्यांनी असं षडयंत्र का केले?. नाहीतर जयंत पाटील खोटं बोलत आहे हे तरी सांगावे लागेल, असे चंद्रशेखर बावनुकळे म्हणाले. 


नाशिकमध्ये आमचं अपक्षांना मतदान -
नाशिकमध्ये आमचा एबी फॉर्म नाही. तिथे अपक्षांमध्ये चुरस आहे. भाजप आणि शिंदे गट हे कधीही महाविकास आघाडीला मतदान करणार नाहीत. ते अपक्षाला मतदान करतील. अपक्षांना मतदान करण्यासाठी खूप पर्याय आहेत. त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल. अजून सत्यजीत तांबे यांनी पाठिंबा मागितलेलं नाही. शुभांगी पाटील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार झाल्या आहेत. त्यामुळे भाजपचा कुठलाही कार्यकर्ता, मतदार महाविकास आघाडीला मतदान करणार नाही. तो कुठल्यातरी अपक्षाला मतदान करेल. ते कुठल्या अपक्षाला करेल हे आज मला माहित नाही. त्याचा निर्णय स्थानिक पातळीवर होईल, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 


आणखी वाचा :
Jayant Patil On Sharad Pawar : पहाटेचा शपथविधी ही पवारांची खेळी, जयंत पाटील यांचं वक्तव्य