परभणी : महाराष्ट्रात सत्तांतरासाठी जुळवाजुळव पूर्ण झाली असून दोन महिन्यात भाजपची सत्ता आणण्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दानवे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी परभणीत आयोजित भाजपच्या बुथप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


दानवे यांनी म्हटलं आहे की, हे तिघे एकत्र सरकारमध्ये बसले आहेत, मात्र त्यांचा एकमेकांवर विश्वास नाही. आम्ही फक्त वाट बघून आहोत. सर्व जुळवाजुळव झाली आहे. येत्या 2 महिन्यात आपलं सरकार येणार आहे, असं रावसाहेब दानवे म्हणाले.


दानवे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये की, आपण राज्यात सरकार स्थापन करू शकत नाही. मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, येणाऱ्या दोन ते तीन महिन्यात राज्यात आपलं सरकार स्थापन झालेलं असेल आणि तुम्ही सगळे माझं म्हणणं लक्षात ठेवा, असं म्हणत दानवे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला.


ते म्हणाले की, राज्यात सरकार कसं स्थापन होईल, हे मी आता सांगणार नाही. मात्र, सरकार स्थापन झाल्यावर आपण महाविकास आघाडीला हे सांगू. आम्ही सध्या फक्त होणाऱ्या निवडणुका पार पडण्याची वाट बघत आहोत. त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी हे लक्षात घेऊन काम करायचं की, महाराष्ट्रात आपण सरकार स्थापन करणार आहोत, असं ते म्हणाले.


VIDEO : नेमकं काय म्हणाले दानवे, पाहा व्हिडीओ



प्रवीण दरेकर यांनी देखील केला आहे दावा


दानवे यांच्या आधी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील सरकार बदलाबाबत भाष्य केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांमध्ये भाजपचा विजय होणार आहे. या निवडणुका झाल्यानंतर सरकार पडणार आहे, आम्हाला सरकार पाडावं लागणार नाही, महाराष्ट्राच्या भल्यासाठी ते घडून येईल, असं दरेकर यांनी म्हटलं होतं.