Maharashtra Political crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत बंड पुकारलेय. बंडखोर आमदार सूरत मार्गे गुवाहटीला पोहचले आहेत. गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी बंडाला भाजपचा पाठिंबा असल्याचं जाहीर केले. त्यानंतर आता राजकीय हलचालींना वेग आलाय. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने 12 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवलेय. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पहिल्या टप्प्यात १२ नावं दिली, उरलेल्यांवर पण कारवाईची मागणी करु, असेही त्यांनी सांगितलेय. 


खासदार अरविंद सावंत म्हणाले की, जे काही आकडे दाखवले जात आहेत ते चुकीचे आहेत. आम्ही दोन बैठका घेतल्या. नवनिर्वाचित गटनेते अजय चौधरी व प्रतोद यांनी व्हीप जारी केला होता. काही जणांनी त्यास उत्तर दिले आहे, मात्र यात काही खोटी कारणं पण आहेत. त्यांच्या हिशोबानं त्यांनी उत्तरं दिली आहेत.  शिस्तभंगाची कारवाई करावी म्हणून 12 जणांची नावे दिली आहेत. त्यांचे सदस्य रद्द करावेत अशी मागणी केली आहे. 


कोण आहेत ही 12 आमदार ज्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आलीय?  
1 ) एकनाथ शिंदे
2) अब्दुल सत्तार 
3) संदीपान भुमरे 
4) प्रकाश सुर्वे 
5) तानाजी सावंत 
6) महेश शिंदे 
7) अनिल बाबर 
8) यामिनी जाधव 
9) संजय शिरसाट 
10) भरत गोगावले 
11) बालाजी किणीकर 
12) लता सोनावणे


एकनाथ शिंदे काय म्हणाले?


एकनाथ शिंदे यांनी आमदारांवरील कारवाईनंतर ट्विट करत प्रत्युत्तर दिलेय. आपल्या ट्वीटनंतर ते म्हणाले की, कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? तुमची बनवाबनवी आणि कायदा आम्हालाही कळतो! घटनेच्या 10 व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा  मकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. 12 आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही. कारण आम्हीच वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना व शिवसैनिक आहोत. कायदाही जाणतो, त्यामुळे असल्या धमक्यांना भीक घालत नाही. तुम्ही संख्या नसताना अवैध गट तयार केला म्हणून तुमच्यावरच कारवाईची आमची मागणी आहे.