मुंबई: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध चांगले असून आम्ही एकटे पडलो असताना फडणवीसांनीच आपल्याला संरक्षण दिलं असल्याची कबुली दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात जेवढ्या लवकरात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला जाईल. फ्लोअर टेस्ट घ्या, त्यावेळी आमची भूमिका मांडू. आज जे काही महाराष्ट्रात सुरू आहे ते इमोशनली ब्लॅकमेलचा प्रकार आहे असंही ते म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


देवेंद्र फडणवीसांनी स्वत:हून आम्हाला संरक्षण दिलं
बंडखोर आमदारांच्या वतीनं बाजू मांडताना दीपक केसरकर म्हणाले की, माझे भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी चांगले संबंध आहेत. रात्री 12 वाजताही फडणवीस माझा फोन उचलतात. आज जर आम्ही एकटे पडलो तर त्यांच्याकडे मदत मागितली तर त्यात काय बिघडलं. फडणवीसांनी स्वत: हून आम्हाला संरक्षण दिलं. भाजप शासित राज्यात आम्हाला संरक्षण मिळतंय. 


शरद पवारानी तीनवेळा शिवसेना फोडली
दीपक केसरकर म्हणाले की, राऊतांच्या वक्तव्यामुळे मोदी आणि ठाकरे यांचे संबंध बिघडत आहे. शरद पवारांनी तीन तीन वेळा शिवसेना फोडली. शिवसेनेचा आमदार ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या राष्ट्रवादीच्या पडलेल्या उमेदवाराला ताकत दिली जातेय. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यांच्यावर विश्वास होता, पण ते आता शिवसेना संपवत आहेत. सत्ता जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून शिवसेनेला पणाला लावण्यात येत आहे. आम्ही भाजपमध्ये विलिन होणार असं म्हटलं जातंय, पण या अफवा आहेत. 


राऊतांनी राजीनामा द्यावा, ते आमच्यामुळे खासदार
संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना केसरकर म्हणाले की, शिंदे गटाच्या आमदारांचा राऊत यांच्याबद्दल राग आहे. आम्ही जे निवडून आलो ते भाजप-शिवसेनेच्या युतीच्या जिवावर आलो आहोत. राऊत यांच्यासारखे प्रवक्ते कोणत्याही पक्षाला मिळू नये असं दिपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे यांना राऊत रिक्षावाला म्हणतात, पण त्याच रिक्षावाल्याने शिवसेनेचा एक विभाग सांभाळला, ठाण्यातील सत्ता शिवसेनेला मिळवून दिली असंही दीपक केसरकर म्हणाले. त्यामुळे अशी भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. 


शिंदे हेच आमच्या गटाचे नेते
एकनाथ शिंदे हेच आमच्या गटाचे नेते असल्याचा पुनरुच्चार दीपक केसरकर यांनी केला. आमच्या भावनेचा अंत पाहू नका, यापुढे जशास तसं उत्तर देऊ अशी निर्वाणीची भाषा केसरकरांनी वापरली. फडणवीस-ठाकरे यांच्यातील चर्चेकडे सकारात्मक दृष्टीने पाहतो असं दिपक केसरकर म्हणाले. 


खर्च कोण करतंय?
आम्ही आमच्या हॉटेलचे बिलही भरु शकत नाही का असा सवाल दिपक केसरकर म्हणाले. बाहेर तिकडे जाळपोळ सुरू आहे त्यामुळे आम्हाला हॉटेलमध्ये यावं लागलं असं दीपक केसरकर म्हणाले.