Maharashtra Politics Congress:   भ्रष्टाचार भाजपाच्या रक्तातच असून ‘भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही’ ही पंतप्रधानांची पोकळ गर्जना असल्याची टीका काँग्रेसने (Congress) केली आहे. आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पराभवाची भीती सतावू  लागल्याने दडपशाहीच्या मार्गाने पक्ष फोडले जात आहेत. महाराष्ट्रात मागील काही दिवसापासून घाणरेडे राजकारण सुरू आहे. ईडी, सीबीआय (CBI) या सरकारी यंत्रणाची भीती दाखवून विरोधी पक्ष संपवण्याचे गलिच्छ राजकारण सुरु असून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. काँग्रेसबाबतही अफवा पसरवल्या जात असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले. भाजपाच्या या हुकुमशाही प्रवृत्तीला संपवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले. आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याचे म्हटले जात आहे. 


काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गरवारे क्लब हाऊस येथे पार पडली. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, तेलंगाणाचे प्रभारी माणिकराव ठाकरे, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, बस्वराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील बैठकीला उपस्थित होते.


बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपाच्या सत्तापिपासू राजकारणावर आजच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या प्रवृत्तीचा सर्वजणांनी एकत्रिपणे लढा देण्यावर चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे जाहीरपणे आरोप करतात आणि त्यांनाच सन्मानाने सरकारमध्ये सामावून घेत मंत्रीपदे देतात. भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान मोदींचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे पटोले यांनी म्हटले.  नॅशनलिस्ट करप्ट पार्टी म्हणता आणि त्यांनाच सत्तेत सोबत कसे घेता? असा सवालही काँग्रेसने केला. 


काँग्रेसमधून आमदार फुटणार?


काँग्रेसबद्दल भाजपा जाणीवपूर्वक चुकीची माहिती पसरवत असल्याचा आरोप पटोले यांनी केला. राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु असतानाही अशाच बातम्या पेरल्या होत्या, आताही अफवा पसरवल्या जात आहेत पण काँग्रेस पक्षातून कोणीही जाणार नाही. सर्वजण एकजुटीने काम करत आहेत. महाविकास आघाडीतून बिभीषण प्रवृत्ती गेली ते बरेच झाले असे स्पष्ट करुन नाना पटोले म्हणाले की काँग्रेस पक्षाबरोबर जे पक्ष येणार त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची आमची भूमिका आहे. 


यावेळी बोलताना विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही लोक गेले असले तरी त्याचा आमच्या आघाडीवर काहीही परिणाम झालेला नाही उलट आघाडी आणखी बळकट झाली आहे. विधानसभेत आम्ही सर्वजण एकत्रितपणे आणखी चांगले काम करु. पण राज्यात जे राजकारण सुरु आहे ते मात्र महाराष्ट्राच्या जनतेला आवडलेले नाही. जनता भाजपाच्या या राजकारणाला आगामी निवडणुकीत धडा शिकवेल.


भ्रष्टाचाऱ्यांना पंतप्रधानांचे संरक्षण 


पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषा ही केवळ पोकळ गर्जना आहे. भ्रष्टाचार हा भाजपच्या रक्तात भिणलेला आहे. कर्नाटकमध्ये 40 टक्के कमिशनचे भाजपा सरकार होते. त्याच भ्रष्टाचारी लोकांचा पंतप्रधान प्रचार करत होते. भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेऊन भाजपा पक्षाची ताकद वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे पटोले यांनी म्हटले. भाजपाचा हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. समृद्धी महामार्गावर बस अपघातात 26 प्रवाशांना होरपळून मृत्यू झाला. त्यांचा अंत्यविधी होत असताना राजभवनात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा जयघोष करताना भाजपाच्या लोकांना जराही लाज वाटली नसल्याची बोचरी टीका त्यांनी केली. 


भाजपचा चेहरा उघड करणार


भाजपा सरकार जनतेच्या प्रश्नावर बोलत नाही, शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे आहे, महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. भाजपाचे केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात विविध आंदोलने करणार आहे तसेच पत्रकार परिषदा घेऊन भाजपाचा खरा चेहरा उघडा करणार आहे.