कल्याण : मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना दिला. शिवसेना आणि युवा सेनेतर्फे डोंबीवली सावळा राम क्रीडा संकुळावर मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस सुरु असलेल्या महोत्सवात   कोल्हापूर, सांगली, पुणे, कल्याण नाशिक , ठाणे, पारनेर,कोकण मधून मिसळ  स्टॉल धारकांने सहभाग घेतलाय. मिसळ महोत्सवला पहिल्याच दिवसाची डोंबिवलीकरांनी मिसळ खायला चांगलीच गर्दी केली होती. आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मिसळ महोत्सवाला भेट दिली.  यावेळी त्यांनी मिसळीचा आस्वाद देखील घेतला .यावेळी माध्यमांशी बोलताना राऊत यांनी विरोधकांचा इशारा दिला


 शिवसेना खासदार संजय राऊत यांची राज ठाकरेंवर टीका


औरंगाबाद येथे राज ठाकरे यांच्या होणाऱ्या सभेबाबत बोलताना एक हिंदू ओवेसी आणि मुस्लिम ओवेसी दोन्ही महाराष्ट्रात आहेत.  ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एका ओवसीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करीत असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली.


तर सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की, ज्याप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे ती मात्र आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोक एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टीका केली. परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सूड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही. भाजपने गेल्या 2 - 4 वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर लोकांना बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदयसम्राट म्हणून लोकांना माहिती आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, नकला केल्या तरी शेवटी हिंदू हृदयसम्राट हे एकच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.