Trimbakeshwer Mandir : वारकरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या संत निवृत्तीनाथ संजीवन समाधी मंदिर देवस्थान ट्रस्ट त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्तांची निवड झाल्यानंतर देवस्थानच्या भक्ती निवास इमारतीत विश्वस्त मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोणताही वाद न करता एकमताने निलेश गाढवे यांची अध्यक्षपदी तर सोमनाथ घोटेकर यांची सचिव पदी निवड करण्यात आली. 


नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त मंडळ निवड करण्यात आली. कोरोना काळात म्हणजेच ज्यावेळी देशभरात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 2020 साली त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ मंदिर विश्वस्त मंडळ मुदत संपुष्टात आली. त्यानंतर मंदिर समितीवर धर्मादाय आयुक्तांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. देवस्थान ट्रस्टची विश्वस्त मंडळ निवड अनेक दिवसांपासून प्रलंबित राहिली होती. कोरोना काळ असल्याने विश्वस्त मंडळ निवड लांबणीवर पडली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ही निवडप्रक्रिया पार पडली. त्यानंतर बैठक घेण्यात येऊन विश्वस्त मंडळाचा अध्यक्षपद ठरविण्यात आले. 


यावेळी विश्वस्त मंडळातून अध्यक्षपदी निलेश गाढवे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सोमनाथ घोटेकर यांची सचिव पदी निवड करण्यात आली. यावेळी बैठकीत मंदिर परिसरात सुरू असलेले विकास आराखड्याचे काम वेगाने पूर्णत्वास नेण्यासाठी निर्धार व्यक्त करण्यात आला या बैठकीस निवड झालेल्या सर्व विश्वस्त उपस्थित होते. माजी विश्वस्त ज्येष्ठ सहकार्य या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे आहे. 15 चा प्रस्तावित परिसर विकास आराखडा काम सुरू आहे. सद्यस्थितीत मंदिराच्या नूतनीकरणाचे काम सुरु असून मंदिर परिसरातील सर्वच परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. आता विश्वस्त मंडळी स्थापन झाल्याने आगामी कामकाजासाठी सोयीस्कर असल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले. 


असे आहे विश्वस्त मंडळ 
विश्वस्त मंडळासाठी 185 इच्छुकांनी यासाठी अर्ज केले होते. जवळपास 165 इच्छुकांनी मुलाखती दिल्याचे समजते. त्यातून पुढील नऊ विश्वस्त निवडण्यात आले. नारायण मुठाळ सिन्नर तालुका, श्रीपाद कुलकर्णी नाशिक, मनोज कुमार राठी नाशिक, राहुल साळुंके नाशिक, अमर ठोंबरे तालुका चांदवड, कांचन ताई जगताप उकाडे, निलेश गाढवे देवळाली कॅम्प, गोकुळ गांगुर्डे चांदवड तालुका, सोमनाथ घोटेकर नाशिक हे नऊ विश्वस्त भाविकांमधून निवडण्यात आले आहे. यात भानुदास गोसावी, जयंत गोसावी, योगेश गोसावी हे तीन विश्वस्त आहेत. तर पदसिद्ध विश्वस्त म्हणून त्रंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे ट्रस्टचे विश्वस्त असतात, असे तेरा विश्वस्त पाच वर्षांसाठी निवडले गेले आहे. दरम्यान त्र्यंबक शहरामधून अनेकांनी विश्वस्त होण्यासाठी अर्ज केलेले होते. पण  त्र्यंबकच्या सामान्य नागरिकांमधून (3 पुजारी आणि 1 पदसिद्ध वगळता) विश्वस्त निवडला गेला नाही. यामुळे नागरिकांमध्ये तसेच ज्यांनी मुलाखती दिल्या होत्या, त्यांच्यामध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान एकमेव महिला विश्वस्त निवडण्यात आली आहे.