Nashik Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) स्वातंत्र्यवीर सावरकर (Sawarkar) यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. राज्यातील वातावरण तापलं असून नाशिकमध्ये (Nashik) देखील भाजप (BJP), मनसे (MNS), शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 


आज राहुल गांधी बुलढाणा (Buldhana)मध्ये आहेत आणि शेगावमध्ये (Shegaon) त्यांची सभा होणार आहे. काल त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सावरकरांच्या मुद्द्यावरती आपण ठाम आहोत, आपण केलेल्या टीकेवरती ठाम असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आपल्या विधानाचा एक प्रकारे त्यांनी पुनर्विचार सुद्धा केला. याच वक्तव्यानंतर राज्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप, मनसे, शिडीने गटाकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आज भगूर मध्ये आंदोलन करण्यात आले. शिंदे गट, भाजपा या सर्व पक्षांच्या माध्यमातून राहुल गांधींचा निषेध करण्यात आला असून स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. 


सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र (Maharashtra) फिरत आहेत. अशातच राहुल गांधी यांनी मंगळवारी वाशिम (Washim) येथे भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या सभेवेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्याचं आरोप करण्यात येत आहे. यामुळे भाजप शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. दुसरीकडे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी भारत जोडो यात्रा थांबविण्याची मागणी देखील केली आहे. त्यामुळे राज्यभरात राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भाजप, मनसे आणि शिंदे गटाने एकत्र येत आंदोलन केले आहे. 


यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय राहुल गांधींच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी खासदार हेमंत गोडसे म्हणाले कि, भगूर हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जन्मभूमी असून संपूर्ण देशाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभिमान आहे. त्यांनी केलेला त्याग आणि त्यांनी दिलेला बलिदान हे खूप मोठे असून संपूर्ण देशातल्या नागरिकांना माहिती आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं काय योगदान आहे? काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना माहितीच नाही. त्यांनी केलेला त्याग, त्यांचे बलिदान या सगळ्यांची माहिती राहुल गांधींना नसल्याने ते बरळत असल्याचे गोडसे म्हणाले. 


काय म्हणाले होते, राहुल गांधी? 
एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.