मुंबई : तुम्ही सभागृहात जे बोलता ते केले नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तसेच तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचे भान असले पाहिजे. पण आता उथळपणा अधिक असतो असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आले पाहिजे असे देखील ते यावेळी म्हणालेत. सभागृहात आपण बोलावं कसं हे आपण शिकलं पाहिजे. अर्थसंकल्पाच्या भाषणात शेरोशायरी करायची, संत वचने सांगायची आणि विरोधात वागायचे मी फडणवीस यांच्याशीही बोललो सभागृहात किती हमरीतुमरी करायची असे देखील मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. 


महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स. पागे संसदीय -प्रशिक्षण केंद्रातर्फे विधिमंडळ सदस्यांसाठी विविध प्रबोधनात्मक आणि प्रशिक्षणात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच मालिकेत आज मंगळवार, 5 ऑक्टोबर तसेच बुधवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे ‘राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदार संघाच्या संदर्भात…’ या संकल्पनेवर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबाबत आपले मत व्यक्त केले. पावसाची सुरुवात आपल्याकडे चक्रीवादळाने होते. प्रत्येकवेळी पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते ? तात्काळ मदत करावी लागते. मी खोटे बोलणार नाही. लोकांना धीर देताना उगीच काहीही बोलायचे नसते. माझ्यावर टीका झाली तरी चालेल”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 


मृणाल गोरेंचे दिले उदाहरण


  सभागृहातील आपली वागणूक, संसदीय भाषा याचाही विचार व्हायला हवा असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृणाल गोरेंचे उदाहरण आठवत असल्याचे सांगितले. सत्तेच्या मोहापायी मी दुसर्‍या पक्षात जाणार नाही अशी ठाम भूमिका त्या मांडायची असे त्यांनी सांगितले. त्या विरोधी पक्षनेत्या होत्या एखादी माहिती आली की त्या खातरजमा करायच्या आणि नंतर सभागृहात मुद्दा मांडायच्या पण आता उथळपणा आल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत. तसेच अर्थसंकल्प मांडताना शेरोशायरी, संत वचने आली पाहिजेत का? अर्थसंकल्प समजुन त्यावर नेमकेपणाने बोलणे हे कठिण असते. अर्थसंकल्प मांडलाय  माझ्या मतदारसंघासाठी त्यात काय आहे हे समजून त्यादिशेने पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींची काम असल्याचे सांगत त्यांनी  विरोधकांना कानपिचक्या दिल्या. दिवाळी आल्यानंतर मला माझे बालपण आठवते. ते छान मातीने सारवायचे त्यावर ठिपक्यांची रांगोळी असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्प ही ठिपक्यांची रांगोळी असल्याचे म्हटले आहे. 


काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उपसभापती यांनी थोडे गुरुजीसारखे वागावे लागेल. मी विधान परिषदेचा, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य. मला दिवाळीतील ठिपक्यांची रांगोळी आठवते, ठिपक्या जोडल्या की एक परिपूर्ण रांगोळी होते. तसेच सर्व मतदारसंघ जोडून राज्य उभे राहते असे देखील ते म्हणालेत.